जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी, भाजप की महाविकासआघाडी, कुठे कोणाची बाजी?

| Updated on: Jan 07, 2020 | 7:38 AM

विधानसभा निवडणुकांनंतर सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा निवडणुका सुरु झाल्या (zilla parishad election result) आहेत. या निवडणुकांच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी, भाजप की महाविकासआघाडी, कुठे कोणाची बाजी?
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकांनंतर सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा निवडणुका सुरु झाल्या (zilla parishad election result) आहेत. या निवडणुकांच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. तर भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला लागली (zilla parishad election result) आहे.

वर्धा, जालना, लातूर, अमरावती या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आज (सोमवार) निवडणुका पार पडल्या. यात काही ठिकाणी भाजपने तर काही ठिकाणी महाविकासाआघाडीने बाजी मारली.

वर्ध्यात भाजपचा अध्यक्ष

वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सरिता गाखरे तर उपाध्यक्षपदी वैशाली येरावार विजयी झाल्या आहेत. स्पष्ट बहुमत असताना त्यांना शिवसेनेच्या दोन सदस्यांचीही साथ मिळाली आहे. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 34 मतं मिळाली. तर विरोधकांतील दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 18 मतं मिळाली. हा विजय साजरा करताना काही कार्यकर्त्यांनी चक्क जिल्हा परिषदेच्या आवारातील सायलन्स झोनमध्ये फटाके (zilla parishad election result) फोडले.

जालन्यात महाविकासाआघाडी यशस्वी

जालना जिल्हा परिषदेची सत्ता राखण्यात महाविकास आघाडीला पुन्हा एकदा घवघवीत यश मिळालं आहे. जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकासआघाडीतील शिवसेनेचे उत्तम वानखेडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्याच महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे आणि राजेश टोपे यांच्या गुप्त बैठकीनंतर भाजपकडून अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने महाविकासआघाडीचा विजय झाला.

लातूरमध्ये भाजपला बहुमत

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल केंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपच्याच भारतबाई साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपला बहुमत आहे. त्यामुळे इथे काँग्रेस-राष्ट्रवादीने आपली उमेदवारी ऐनवेळी मागे घेतली.

लातूर जिल्हा परिषदेच्या एकूण 58 सदस्यांपैकी भाजपाकडे 35 तर काँग्रेसकडे 15, राष्ट्रवादी 5, शिवसेना 1, अपक्ष 2 अशी संख्या आहे. भाजपकडे 58 पैकी 35 एवढी मोठी संख्या असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने अर्ज मागे (zilla parishad election result) घेतला.

अमरावती महविकासआघाडीची बिनविरोध सत्ता

अमरावती जिल्हा परिषदेची आज अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी निवडणूक झाली, अध्यक्षपदी काँग्रेसचे बबलू देशमुख, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विठ्ठल चव्हाण यांची बिनवरोध निवड झाली आहे. गेल्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापना केली होती.

अमरावती जिल्हा परिषदेत 59 एवढी सदस्य संख्या होती. त्यापैकी 2 सदस्य बळवंत वानखेडे व देवेंद्र भुयार हे विधानसभेवर निवडून गेल्याने सध्या जिल्हा परिषदेत 57 सदस्य आहेत. बहुमतासाठी 29 सदस्यांची गरज होती. मात्र काँग्रेसची 35 पेक्षा जास्त सदस्य संख्या जुळल्याने भाजपने निवडणुकीतून आधीच माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यास काँग्रेस नेते यशस्वी (zilla parishad election result) झाले.