बीड लोकसभा : तगडा प्रतिस्पर्धी नसल्याने डॉ. प्रितम मुंडेंचा मार्ग सुकर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

बीड : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. सर्व पक्ष राजकीय समीकरणं जुळवण्याच्या तयारीत आहे. टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. निवडणुका आल्या की जनतेचा आणि विकासाचा मुद्या राजकीय पटलावर अग्रस्थानी येतो. यंदा 2019 लाही बीड लोकसभेत तोच कित्ता गिरवला जाणार आहे. मात्र 2014 च्या निवडणुकीत दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या अकाली […]

बीड लोकसभा : तगडा प्रतिस्पर्धी नसल्याने डॉ. प्रितम मुंडेंचा मार्ग सुकर
Follow us on

बीड : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. सर्व पक्ष राजकीय समीकरणं जुळवण्याच्या तयारीत आहे. टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. निवडणुका आल्या की जनतेचा आणि विकासाचा मुद्या राजकीय पटलावर अग्रस्थानी येतो. यंदा 2019 लाही बीड लोकसभेत तोच कित्ता गिरवला जाणार आहे. मात्र 2014 च्या निवडणुकीत दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर त्यांची मुलगी डॉ. प्रितम मुंडे यांना  जिल्ह्यातील जनतेने खासदारपदी विराजमान केलं. पण जिल्ह्यातील अनेक प्रश्न आजही कायम आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, शेतकरी प्रश्न या सर्वांवर तोडगा काढण्यात खासदारांना यश आलेलं नाही.

बीड लोकसभेचा इतिहास

बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा दबदबा केंद्रात स्व. केशरबाई क्षीरसागर यांच्यापासून ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे निर्माण झाला. त्यामुळे एक वेगळी ओळख जिल्ह्याची दिल्लीत आहे. स्व. माजी खा. केशरबाई क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे विणून गोरगरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन दिलं. तसेच सहकारातून विकास या तत्वावर सहकारी बँक स्थापून बेरोजगार तरुणांना उद्योगासाठी साह्य केल्याने अनेक बेरोजगार तरुण स्वावलंबी झाले. तसेच स्व. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सहकारी बँक, साखर कारखाना उभारुन शेतकऱ्यांसह बेरोजगारांना आधार दिला. मात्र कायम दुष्काळी असलेल्या या जिल्ह्यात शेतकरी हतबल होऊन मेटाकुटीला आले. त्यातच हातांना कामे नसल्याने आणि बेरोजगारांचे प्रमाणाचा वाढता आलेख आहे.

नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग झाल्यास दळणवळणाचे साधन निर्माण होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या आशेने स्व. गोपीनाथ मुंडे यांनी 2014 लोकसभा निवडणुकीत घोषणा केली होती, की केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल, तर मी 2019 मध्ये रेल्वेने बीडला येईल अशी घोषणा त्यांनी केली. मात्र काळाने घाला घातला आणि गोपीनाथ मुंडेंचे अकाली निधन झाले. त्यांच्या पश्चात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांची मुलगी  प्रितम मुंडे यांना भरघोस मते देऊन जनतेने त्यांना खासदारपदी बसवले.

आव्हाने कायम

अशातच जिल्ह्याच्या पालकमंत्री आसलेल्या पंकजा मुंडे यांनी मी माझ्या बाबांचे स्वप्न साकार करणार असा शब्द देत गोपीनाथ मुंडेंचा वारसा हाती घेत दोन्ही बहिणी मिळून जिल्ह्याचा कारभार हाकू लागल्या. त्यामुळे आता जिल्ह्याचा विकास होईल अशी निर्माण झाली. खासदार डॉ. प्रितम मुंडे असताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी रजनी पाटली यांची वर्णी राज्यसभेवर लावून त्यांच्या रुपाने जिल्ह्याला दुसराही खासदार दिला. जिल्ह्यात दोन खासदार असताना रजनीताई पाटील या केज विधानसभा मतदारसंघाच्या आणि पक्षश्रेष्ठींनी आखलेल्या लक्ष्मण रेषा ओलांडत नसल्याची चर्चा बीडकरांत कायम होते. खा. प्रितमताई सुद्धा ठरावीक कार्यक्रमात हजेरी लावत जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न आणि जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बेरोजगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रेल्वे प्रश्न याची उकल करताना दिसत नाहीत. मुंडेसाहेबांचे स्वप्न असलेल्या रेल्वेचे तर 2019 साल उजाडले! लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की बीडमध्ये रेल्वेची शिट्टी कधी वाजणार असा सवाल आत्ता उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटतटामुळे उमेदावार कोण याचा अंदाज कुणाला येत नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. शिवसेना सत्तेत आल्यापासून तळ्यातमळ्यात करत असून स्वबळाचा नारा देत आहे. मात्र याठिकाणी त्याचा काही परिणाम होईल का हा संशोधनाचा भाग आहे. परंतु यासगळ्या गर्दीत वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागली असून उमेदवाराचा ते कानोसा घेत असल्याचं दिसत आहे.

बीड लोकसभा राज्याच्या राजकारणात सर्वाधिक केंद्र स्थानी या साठी आहे की इथून गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या पाच प्रमुख नेतृत्वापैकी एक पंकजा मुंडेंचा हा जिल्हा आहे. गोपीनाथ मुंडे हयात असताना हा जिल्हा भाजपचा गड मानला जायचा. पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कन्या पंकजा देखील इथून स्वतःला धरून चार आमदार आणि एक स्थानिक आमदार आणि बहिण खा. डॉ. प्रितम मुंडेंना निवडून आणण्यात यशस्वी झाल्या. मात्र आज वर्तमान वेळी जिल्ह्यात त्यांना त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांचे कडवे आव्हान उभे आहे. बीड जिल्ह्यात बहिण प्रितम मुंडे यांचा ऐतिहासिक विजय झाला. मात्र त्याला वडिलांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणाची किनार होती. सध्या ती परिस्थिती नाही. प्रितम मुंडे यांचे कार्य ठळक असे काही नाही. जी काही मदार आहे ती पंकजा यांच्यावर. अगदी भावनिक लाटेत देखील धनंजय यांचा पराभव करताना पंकजा यांना केवळ 25 हजाराच्या जवळ आघाडी घेता आली. मात्र याच जिल्ह्यात गेवराई मतदारसंघात भाजपचे आ. लक्ष्मण पवार यांनी मात्र तब्बल 60 हजार मतांची आघाडी घेतली. लक्ष्मण पवार आज पंकजा यांच्यापासून अंतरावर आहेत. कारण गेवराई मतदारसंघात शिवसेनेचे बदामराव पंडित यांच्या सोबत पंकजा यांचे राजकीय सूत चांगले आहे. अशा वेळी लोकसभेच्या बेरजेत पंकजांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

भाजपसमोरच्या अडचणी

शेतकरी आणि बेरोजगारांची नाराजी

ऊसतोड कामगारांना महामंडळ आश्वासन फक्त योजना घोषित करून बारगळले

जिल्ह्यातील महिला अत्याचार

जिल्हा परिषदेतील सत्तांतर घडवून आणताना गोपीनाथ मुंडे यांना राजकीय धोका देणाऱ्या धसांना आमदार करणे अनेक निष्ठावंतांना पटलेले नाही

गोपीनाथ मुंडे यांचा वंजारी मतदार धनंजय मुंडेंमुळे विभाजित

मराठा समाजाच्या आरक्षणावर पंकजा यांची भूमिका संशयित असल्याने मराठा समाज अनुकूल नाही, जो जिल्ह्यात संख्येने क्रमांक एकवर आहे.

भाजपसाठी अनुकूल मुद्दे

राष्ट्रवादीतील स्थानिक नेतृत्वात कमालीचे वितुष्ट आहे.

राष्ट्रवादीचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर हे पक्षावर नाराज आहेत.

गेल्या चार वर्षात उमेदवार म्हणून कुठलाच चेहरा राष्ट्रवादीकडे नाही.

शरद पवार देतील तो उमेदवार होणार असेल तर विरोधकांना तयारीस वेळ नाही.

पंकजा मुंडे यांच्या खात्याचे कामे जिल्ह्यात झालेली आहेत.

भाजपचे उमेदवार

डॉ. प्रितम मुंडे

राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार

अमर सिह पंडित ( इच्छुक नाहीत, पक्षाने आदेश दिला तर तयारी )

जयदत्त क्षीरसागर (ओबीसी विरुद्ध ओबीसी असे चित्र तयार झाले तर )

विनायक मेटे (स्थानिक पातळीवर पंकजा यांच्या समवेत मतभेद पाहता)

प्रचारातील मुद्दे

मराठा आरक्षण

शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बेरोजगारी

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय स्पर्धा

जिल्हा परिषद बीडमधील चौकशी प्रकरणं

जिल्हा मध्यवर्ती बँकमधील प्रकरण