गडचिरोली लोकसभा : काँग्रेस आणि भाजपाला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आता क्रमांक आहे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचा. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चिमूर, ब्रह्मपुरी, आमगाव या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. भाजपने 2014 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला. पण आदिवासी बांधवांच्या समस्या आजही कायम आहेत. […]

गडचिरोली लोकसभा : काँग्रेस आणि भाजपाला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण
Follow us on

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आता क्रमांक आहे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचा. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चिमूर, ब्रह्मपुरी, आमगाव या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. भाजपने 2014 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला. पण आदिवासी बांधवांच्या समस्या आजही कायम आहेत. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या पक्षानेही या मतदारसंघातील समस्या सोडवलेल्या नाहीत.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, पाणी, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कामे रखडलेली आहेत. सध्या जिल्ह्यात मेड्डीगट्टा प्रकल्प आणि सुरजागड लोह खनिज प्रकल्प पूर्ण झालेला नाही. या साडेचार वर्षात जम्बो पोलीस भरती घेण्यात आली नाही आणि रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या चार मुद्द्याला घेऊन युवा आणि सुशिक्षित बेरोजगार वर्ग भाजप पक्षावर नाराज असल्याचं दिसतं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसचे नामदेवराव उसेंडी होते. या सहा विधानसभापैकी गडचिरोली भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी, तर आरमोरीत भाजपाचे कुष्णा गजबे, अहेरीत राजे अमरिशराव आत्राम, चिमूरमध्ये भाजपाचे बंटी बागडिया, ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि आमगावमध्येही भाजपचाच आमदार आहे. अशोक नेते यांनी मोदी लाटेत विजय मिळवला असला, तरी त्यांचा दांडगा जनसंपर्क ही जमेची बाजू आहे.

देशातील 25 मागास जिल्ह्यांच्या यादीत गडचिरोली जिल्हा हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून भारतात ओळखला जातो. या जिल्ह्यात आदिवासी राखीव आमदार आणि खासदार आहेत. या जिल्ह्याला एकीकडे छत्तीसगड, तर दुसरीकडे तेंलगणा राज्याची सीमा लागते. या जिल्ह्यातील आदिवासी तेलुगू, गोंडी, मडिया यासोबतच मराठी भाषेचा जास्त वापर करतात.

जिल्ह्यातील अहेरी विधानसभा एक मध्यबिंदू मानला जातो. या विधानसभेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम तीन वेळा निवडुन आले आणि आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते. अहेरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र तिथे आता खिंडार पडली असून बाबांचा अपक्ष दीपक आत्राम आणि मागील निवडणुकीत त्यांचे पुतणे भाजपचे अंबरीश आत्राम यांनी पराभव केला.

जिल्ह्यात राष्ट्रवादीने अनेक वर्षे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, धर्माराव बाबा आत्राम सत्ता स्थापन केली. सध्या धर्माराव बाबा आत्राम कन्या भाग्यश्री आत्राम जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या लढण्याच्या तयारीला लागल्या आहेत. आगामी निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघटनेचं मोठ्या राजकीय पक्षाला आव्हान राहणार आहे. संघटनेचे सर्वेसर्वा दिपक दादा आत्राम यांनी अहेरी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. दिपक दादा एकदा आमदार झाले, तरीही आदिवासी विघार्थी संघटनेने अनेक ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवून सत्ता स्थापन केली. गडचिरोली जिल्हा परिषदही सध्या आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या हातीच आहे.

सध्या जिल्ह्यात सर्वात मोठी अपक्ष संघटना म्हणजे आदिवासी विघार्थी संघटना आहे. दिपक दादा आत्राम आणि अजय कंकाडालवार ज्या पक्षाला पाठिंबा देतात, लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक जिंकतो, असं बोललं जातं.

अहेरी विधानसभेतून आमदार असलेले राजे अमरीशराव आत्राम सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अहेरी विधानसभेत राजे कुटुंबातुन समोर आलेले राजे अमरीशराव स्वर्गीय विश्वेश्वराव आत्राम यांचे नातू आणि स्वर्गीय राजे सत्यवानराव आत्राम यांचे चिरंजीव आहेत. या भागात विश्वेश्वराव महाराजांनी अनेक दुर्गम भागातील लोकांची समाजसेवा केली. कट्टर विदर्भावादी नेता म्हणून त्यांची ओळख होती. पण त्यांचे नातू भाजपातून निवडून आले. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी जिल्ह्यातील दोन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. मेड्डीगट्टा जल प्रकल्प हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सीमावर्ती भागात सुरू होतोय. याचा फायदा फक्त तेलगंणावासियांना होईल, असा आरोप आहे. तर दुसरा प्रकल्प सुरजागड लोह खनिज उत्खन्न हा प्रकल्प एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर सुरू आहे. यालाही स्थानिकांचा विरोध होता. स्थनिकाची मागणी होती की सुरजागड प्रकल्प एटापल्लीतच उभारावा. पण तसं काही झालं नाही आणि आता विदर्भ राज्याची घोषणा भाजप सरकार करणार नाही. या तीन मुद्द्यांना घेऊन विरोधक राजे अमरीशराव आत्राम यांना लक्ष्य करत असतात. एक गोष्ट मान्य करावीच लागेल, की राजे अमरीशराव यांनी सर्वात जास्त निधी मुंबईहून खेचून आणलाय. वयाने कमी असलेले राजे अमरीशराव आणि खासदार अशोक नेते यांचा वेगवेगळा गट आहे. भाजपातच  दोन गट असल्याने यांच्यात चांगलीच रस्सीखेच दिसून येते.

गडचिरोली विधानसभेत 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आलेले नामदेवराव उसेंडी यांना विजय वडेट्टीवार याचा मोठा पाठिंबा आहे. काँग्रेसमध्ये दमदार चेहरा असलेले विजय वडेट्टीवार सध्या ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार आणि विधानसभेचे उपगटनेते आहेत. ब्रम्हपुरी विधानसभेवर विजय वडेट्टीवार यांचं वर्चस्व आहे. या भागात टक्कर देणारे भाजपचे भांगडिया कुटुंब आहे. येत्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार टक्कर देऊ शकतात.

नामदेवराव उसेंडी वैद्यकीय पदवीधर असून अभ्यासपूर्वक नेता अशी त्यांची ओळख आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली मतदार संघातून माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांचं नाव समोर येत आहे.

आरमोरी विधासभा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण मोदी लाटेत भाजपने इथे विजय मिळवला. कुष्णा गजबे सध्या इथे आमदार आहेत. 2014 मध्ये पराभव झालेले काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम आरमोरी विधानसभेतून दोन आमदार राहिले आहेत. यंदा आनंदराव गेडाम भाजपाला चांगलीच टक्कर देणार असं चित्र इथे दिसतं.

जिल्ह्यातील नक्षलवाद, ओबीसी, रेल्वे, रोजगार आणि सिंचन या समस्या आजही कायमच आहेत. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आपापले जनसंपर्क अभियानही सुरु झालंय. दोन्ही पक्षात गटबाजी स्पष्ट दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन अंतर्गत वाद बाजूला ठेऊन एकजूट होऊन लढणाऱ्या पक्षाचाच विजय होईल हे मात्र नक्की..