अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) श्रेयवादावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) आणि खासदार सुजय विखे यांच्यात महामार्गाच्या कामावरून आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे लोकसभेला रोहित पवार निवडणूक लढणार अशी जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. यावर रोहित पवारांनी भाष्य केलंय. तर ज्या पद्धतीने कर्जत जामखेडमध्ये विकास सुरू आहे. त्यामुळे अनेक लोकांना वाटत असेल की हे खासदार झालो तर अजून चांगले काम करतील मात्र या चर्चेला काही तथ्य नाही मला आमदार म्हणूनच काम करायचं अस रोहित पवारांनी स्पष्ट केलाय.
अहमदनगर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाची आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. या आधीच्या नेत्यांनी किती वेळा मंत्र्यांना भेटून या रस्त्यासाठी पाठपुरावा केला याचा पुरावा त्यांनी लोकांना द्यावा, असे आवाहन त्यांनी केलं. तर नितीन गडकरी कुठलाही भेदभाव करत नाहीत, अशा शब्दात त्यांनी गडकरींचं कौतुकही केलं. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये 4 हजार 400 कोटीचे रोड आले त्यातल्या 16.50 कोटीचे रोड हे फक्त कर्जत-जामखेड मध्ये आले. यासाठी मी पाठपुरावा केला तसेच काही महत्त्वाचे रोड अजूनही जिल्ह्यात आले नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचा पाठपुरावा कमी पडला असेल, असा टोला त्यांनी लगावलाय.
दरम्यान, मी पालकमंत्री असताना प्रस्ताव सादर केला होता,असं माजी मंत्री राम शिंदे यांनी म्हटलंय. मात्र आता यायचं आणि दिल्लीला जाऊन फोटो काढायचा असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावलाय. देशात भाजपा सरकार असून या रस्त्यासाठी आम्ही पाठपुरावा केलाय. तसेच खासदार देखील सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याचं श्रेय कोणीही घेण्याची आवश्यकता नाही. याचं श्रेय फक्त नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि भाजपचं आहे असं माजी मंत्री राम शिंदे यांनी म्हटलंय.
त्याचबरोबर श्रेयावादाची लढाई आयुष्यभर सुरूच राहणार आहे, मात्र मी तर म्हणतोय तुम्ही मोदींचा फोटो लावा आणि श्रेय घ्या आमची काही हरकत नाही, असा टोला खासदार सुजय विखे यांनी लगावलाय. तर तुम्ही आमच्या निधी शिवाय जगू शकत नाही मात्र तेवढी नैतिकता दाखवावी लागेल की हे काम मोदींचं आहे, हे मान्य करावं लागेल, असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केलाय.
इतर बातम्या-