काजू समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या, 18 चिमुरड्यांना विषबाधा

| Updated on: Jan 07, 2021 | 11:14 AM

काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे अमरावतीत 18 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाली. (Amravati food poisoning Jatropha )

काजू समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या, 18 चिमुरड्यांना विषबाधा
Follow us on

अमरावती : काजू समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे 18 चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कुंभी वाघोली गावात हा दुर्दैवी प्रकार घडला. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Amravati Kids food poisoning after eating Jatropha seeds)

काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 18 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाली. खेळत असताना मुलांना चंद्रज्योतीच्या झाडाखाली बिया दिसल्या. काजू समजून मुलांनी त्या बिया खाल्ल्या. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागला. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला.

मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. दोन मुलं बेशुद्ध झाली असून त्यांच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर इतर मुलांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा आहे. मात्र त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

चंद्रज्योतीच्या बिया अपायकारक का?

सामान्यपणे चंद्रज्योती, रतनज्योत किंवा रान एरंड म्हणून ओळखले जाणारे जेट्रोफा ही विशेषतः दक्षिणेकडील भागात आढळणारी एक सदाहरीत वनस्पती आहे. पूर्वीपासून औषधी उपयोगासाठी त्याचा वापर होत असे. अलिकडे जैविक-इंधन म्हणूनही त्याला प्रोत्साहन दिले जाते.

रस्ताच्या कडेला किंवा शाळेच्या परिसरात झुडुपांसारख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या वनस्पतीची फळं आकर्षक असल्याने लक्ष वेधून घेतात. परंतु चंद्रज्योतीचे फळ किंवा बिया खाल्ल्याने लहान मुलांना विषबाधा होत असल्याचे दिसून आले आहे.

काजुच्या बिया समजून लहान मुलं या बिया फोडून खात असल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. फळ खाल्यानंतर लहान मुलांना वारंवार उलट्या, ओटी-पोटात वेदना होतात, तोंडातून फेस येतो. (Amravati Kids food poisoning after eating Jatropha seeds)

चंद्रज्योतीच्या बियांबाबत जनजागृती

अनेक वर्षांपासून चंद्रपूर-अमरावतीसह बहुतांश जिल्ह्यात चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने ग्रामाीण भागातील विद्यार्थ्यांना विषबाधा होत असल्याचे प्रकार समोर येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.

नाव माहिती नसलेले कोणतेही फळ खाऊ नये. शाळेत असताना शिक्षकांना, तर घरी असताना पालकांना विचारल्याशिवाय अनोळखी फळं, वनस्पती खाऊ नयेत, असं आवाहन केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

लग्न बाधलं, 100 जणांना जेवणातून विषबाधा; शिर्डीतील धक्कादायक घटना

चंद्रपुरात तेराव्याच्या जेवणाचे निमंत्रण, 40 लोकांना विषबाधा, पोलीस पाटलाकडून लॉकडाऊनचे उल्लंघन

(Amravati Kids food poisoning after eating Jatropha seeds)