अमरावती : अमरावती जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) अतिवृष्टी सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण (Wardha Dam) 96 टक्के भरले आहे. त्यामुळे आज दुपारी 12 वाजता अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 दरवाजे 35 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वर्धा नदीला (Wardha River) पूर आला आहे. अमरावती शहरासह मोर्शी,तिवसा,धामणगाव रेल्वे सह ग्रामीण भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवस असाच पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.गेल्या चार दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. अमरावती शहरासह तिवसा,मोर्शी,धामणगाव रेल्वे तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तिवसा तालुक्यातील वरखेड येथे गावात पाणी शिरलं आहे. चक्क गावात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज दिवसभर अमरावतीत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात अंदमान बेटाजवळ चक्राकार वारे वाहत आहे. मान्सूनची ट्रफरेषा हिमालयाच्या पायथ्याशी आहे या स्थितीमुळे विदर्भात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. अमरावतीत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होतं. सकाळी पुन्हा पावसाने तुफान बॅटिंग करायला सुरुवात केली. गेल्या काही दिवसापासून उन्हाने जिवाची लाही लाही होत होती. उकाड्याने हैराण होत असल्याने या पावसामुळे पुन्हा थंडगार वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवस अश्याच प्रकारे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
अमरावती जिल्ह्यातील लहान,मोठे प्रकल्प प्रथमच तुडुंब भरले. जिल्ह्यातील प्रकल्पात 85.17% जलसाठा आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने मगील वर्षीच्या तुलनेत 26 टक्यांनी जलसाठ्यामध्ये वाढ झाली. मागील वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 67% इतका जलसाठा होता. अमरावती जिल्ह्यात 1 मोठा, 7 मध्यम,तर 47 लघु प्रकल्प आहेत. सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 95.32% इतका जलसाठा आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून नागरिकांना या उकाड्यापासून हैराण केले होते. या दोन दिवसामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात गर्मीमध्ये वाढ झाली होती. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
वाशिम जिल्ह्यातील धनज,उंबरडा बाजार,इंझोरी सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडत आहे. या भागात पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची सोयाबीन,तूर,कपाशी ही पिके सुकू लागली होती. मात्र आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने या पिकांना मोठा आधार मिळाला आहे.