औरंगाबाद: शहरातील घाटी रुग्णालय (Ghati Hospital, Aurangabad) हे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसाठीचे एक महत्त्वाचे शासकीय रुग्णालय आहे. अद्ययावत सुविधा, बेडची भरपूर संख्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या वैशिष्ट्यांमुळे असंख्य रुग्णांचा घाटीतील उपचारांवर विश्वास आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील घाटीत गेल्या दहा वर्षात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र सध्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्या निम्मीच झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी किमान 250 जागा कंत्राटी तत्त्वावर भरण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी राज्य शासनाला पाठवला आहे.
उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास राठोड म्हणाले, घाटीच्या सुरुवातीच्या काळात 500 ते 700 रुग्णांवर उपचार केले जात होते. आता रुग्णसंख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. दरवर्षी 30 कर्मचारी निवृत्त होतात. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या 744 जागा मंजूर आहेत. त्यापैकी 436 भरल्या, तर 29 दिवसांच्या अटीवर 34 कर्मचारी आहेत. 274 जागा रिक्त असून 175 जागा संपुष्टात आल्या आहेत.
घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांतूनही रुग्ण येतात. घाटीत सध्या दररोज किमान 2500 तर वर्षभरात सुमारे 7 लाख जणांवर उपचार होतात. पण औषधांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे आंदोलन, तक्रारी, आरोप-प्रत्यारोपाच्या घटना सातत्याने होतात. विशेष म्हणजे परिचारिका संघटनांनीच आता कर्मचारी कमी असल्याने होणारा त्रास चव्हाट्यावर आणत प्रशासनाच्या नियोजनावर बोट ठेवले आहे.
घाटीत आठ वॉर्ड नव्याने सुरू झाले आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने अनेकदा नातेवाइकांनाच रुग्णाला स्ट्रेचरवरून न्यावे लागते. ही चूक वरिष्ठ स्तरावरील असल्याचे परिचारिका संघटनेच्या इंदुमती थोरात म्हणाल्या. उपअधिष्ठाता डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले की, कामचुकार कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी वॉर्डात पाहणीही केली जाईल. आठवडाभरात त्याचा अहवाल अधिष्ठातांना पाठवणार आहोत.
इतर ठिकाणच्या दोन वैद्यकीय महाविद्यालयांत दररोज जेवढ्या रुग्णांवर उपचार होतात तेवढे एकट्या घाटीत होतात. डॉक्टरांवरील विश्वास वाढल्याने कोरोनाकाळात १४ पेक्षा अधिक जिल्ह्यांतून रुग्ण दाखल झाले होते. त्यामुळे तातडीने २५० पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव वैद्यकीय संचालकांना पाठवला आहे. -डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी
इतर बातम्या-
Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी मनपाकडे व्हॅक्सिनेटर्सचा तुटवडा, सध्याची केंद्रसंख्या अपुरी