आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू, पण… प्रकाश आंबेडकर यांचा इशारा काय?

| Updated on: Jan 01, 2024 | 2:27 PM

संघ आणि भाजपने मुस्लिम विरोध अंतिम टोकावर आणला आहे. आता हा विरोध वाढवण्याची जागा राहिली नाही. द्वेष भाजप-संघाच्या राजकारणाचा बेस आहे. त्यामुळे त्यांनी आता ओबीसी आणि मराठा यांच्यात आरक्षणाच्या नावाने भांडणं लावली आहेत. या दोन्ही समाजात द्वेष आणि मत्सर पसरताना दिसतो आहे. हा द्वेष वाढणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू, पण... प्रकाश आंबेडकर यांचा इशारा काय?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 1 जानेवारी 2024 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लोकसभेच्या प्रत्येकी 12 जागा लढवण्याचा फॉर्म्युला दिला आहे. या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आमचा फॉर्म्युला मान्य आहे काय? असेल तर ठिक. नसेल तरीही आमचं म्हणणं काही नाही. मात्र, तुमचा फॉर्म्युला काय आहे ते तरी सांगा? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहेत. तसेच महाविकास आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहू. नाही तर आमची उमेदवारांची निवड सुरूच आहे, असा इशाराही आंबेडकर यांन दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. या पार्श्वभूमीवर मी विधान मोठं करत नाही. पण या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपची सरळ सरळ लढत होणार असल्याचं दिसतंय. असं असलं तरी आम्हाला आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाही हवी आहे. त्यामुळे भाजपला हरवणं सोपं जाईल. आमची ताकद वाया जाणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. त्यामुळे आम्ही स्वत:लाच टाइम बाऊंड घालून घेतला आहे. म्हणून आम्ही आघाडीत आलो तर आलो. नाही आलो तर आम्ही भाजपची सत्ता येणार नाही यादृष्टीने राज्यापुरतं राजकारण करू. आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीच्या निरोपाची वाट पाहू, नाही असं नाही. पण आमच्या उमेदवारांची निवड वगैरे आम्ही चालूच ठेवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

40 बैठका झाल्या, 48 जागांवर निर्णय नाही

आम्ही दिलेला फॉर्म्युला सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का विचारा. त्यांनी हा फॉर्म्युला मान्य केला नाही तर माझं काही म्हणणं नाही. पण हा फॉर्म्युला मान्य नसेल तर तुमचा फॉर्म्युला काय हे तरी सांगा. जेणे करून त्यावर तडजोड होईल. एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होईल. अडीच वर्ष महाविकास आघाडी सत्तेच्या बाहेर आहे. महाविकास आघाडीने या काळात 40 वेळा बैठका घेतल्या. एवढ्या बैठका होऊनही जेव्हा 48 जागांचा वाटप होत नाही, त्यावेळी वेगळ्या चर्चांना उधाण येतं, असंही ते म्हणाले.

राजकीय पक्ष क्लेम करतातच

शिवसेनेने 23 जागांची मागणी केली आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय पक्ष क्लेम करत आहेत. फक्त फॉर्म्युल्यासाठी कधी बसणार हे त्यांनी सांगावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे आमच्या 8 जागा गेल्या असं आम्ही म्हणू शकतो. पण अशा म्हणण्याला आता काही अर्थ नाही. त्यामुळे जे झालं ते झालं. आता मुर्दे उकरून काढण्यात अर्थ नाही. उकरून काढलेल्या मुर्द्यांना जीवदान देता येत नाही. राजकीय पक्ष आहेत. ते निवडणुका लढवणारच. संरजामशाहीची मानसिकता राजकीय पक्षांनी घेऊ नये. राजकीय पक्ष जिंकतील किंवा हारतील हा त्यांचा निर्णय आहे. असं असेल तर भाजपने निवडणुका लढवू नये आम्हीच लढू अशी काही भूमिका घेणार आहात का?, असा टोला त्यांनी लगावला.

आम्ही फिफ्टीफिफ्टी लढू

आघाडीबाबत आमचं शिवसेनेशी बोलणं झालं आहे. शिवसेनेची राष्ट्रवादी किंवा काँग्रेससोबत युती झाली नाही, तर आम्ही दोघेच फिफ्टीफिफ्टी लढणार आहोत. 24 जागा ते लढतील. 24 जागा आम्ही लढू. त्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग ठरलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचं अंडरस्टँडिंग काय हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. त्यांनाच विचारा, असंही ते म्हणाले.

काँग्रेसने ठरवावं

इंडिया आघाडीतील सर्वात महत्त्वाचा पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेसने अजूनही पक्ष वााढवायचा की मोदी सरकार घालवायचं याचा निर्णय घेतला नाही. तो निर्णय घेतला तर सर्व गोष्टी मार्गी लागतील, असं सांगतानाच पुढच्या आठवड्यापासून आम्ही आमचे राजकीय मुद्दे मांडायला सुरुवात करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.