औरंगाबाद: शहरातील कोणताही उत्सव असो की राजकीय सभा-संमेलनं, ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय औरंगाबादकर (Aurangabad Sansthan Ganpati) आपल्या कार्याला आरंभ करत नाहीत. औरंगाबादमधली सर्वात प्राचीन ग्रामदेवता म्हणजे संस्थान गणपती. शहरातील राजाबाजार परिसरात एका पिंपळाच्या झाडाखाली साधारण १० च्या शतकातील ही स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे. अखंड पाषाणातल्या या इतिहासकालीन मूर्तीला शेंदूर लेप देण्यात आलेला आहे. मागील 300 वर्षांपासून म्हणजेच स्वातंत्र्याच्या आधीपासून या गणपतीनं औरंगाबादची असंख्य स्थित्यंतरं अनुभवलीत. संकटात असलेल्यांना धीराचा, विश्वासाचा हात दिला तर अपार श्रद्धा असलेल्यांच्या पदरात भक्तीचं फळही टाकलं. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं संस्थान गणपतीच्या काही आठवणी जाग्या करुयात…
ही मूळची शिवकालीन मूर्ती. त्या काळी गावातील लोक श्रद्धेनं गणपतीची पूजा करत असत. हळू हळू गणपतीवरील श्रद्धेचे अनुभव त्यांना येऊ लागले. त्यामुळे लोकांचा विश्वासही दृढ होत गेला. काही काळानंतर म्हणजेच 1930-40 च्या दरम्यान बाबूलाल पराती, नंदलाल जैस्वाल, शंभूलाल शर्मा, लक्ष्मण शिंदे, शिवनाथ लाहोटी आणि भिकचंद चिचानी, संग्रामसिंग चौहान, गोपीकिशन मालानी आदी ज्येष्ठ मंडळींनी शहरवासियांच्या मनात मानाचं स्थान मिळवलेल्या या गणपतीला एक लाकडी मंदिर बांधलं. अनेक वर्षे या लोकांनी गणपतीची अगदी मनोभावे सेवा केली.
संस्थान गणपतीचे कार्यवाह प्रफुल्ल मालाणी सांगतात, लोकमान्य टिळक औरंगाबादमध्ये एका खटल्याच्या निमित्तानं येत असत. त्यावेळी प्रत्येक सुनावणीदरम्यान ते संस्थान गणपतीसमोर डोकं ठेवल्याशिवाय जात नसत. या श्रद्धेचं त्यांना फळही मिळालं. लोकमान्यांनी तो खटला जिंकला. त्यानंतर गणपतीची ख्याती गावोगावी अधिकच पसरत गेली. 1987 मध्ये शहरातील तत्कालीन सेवा देणाऱ्या जेष्ठांनीच गणपतीसाठी संगमरवरी मंदिर उभं केलं.
1987-87 च्या काळात औरंगाबाद महापालिकेची पहिली निवडणूक ठरली. बाळासाहेब ठाकरे सभेच्या निमित्ताने शहरात आले, तेव्हा या गणपतीची ख्याती ऐकली होती. भाषणाआधी त्यांनी आधी या ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं आणि पहिल्या निवडणुकीत शिवसेनाच सत्तेवर यावी, ही विनंती संस्थान गणपतीच्या चरणी केली आणि तसं झालं तर तुला सुवर्णमुकूट अर्पण करेल, असं नवस बोललं. निष्ठेनं भक्ती करणाऱ्यांना फळ देणाऱ्या या गणपतीनं बाळासाहेबांचं हे म्हणणं ऐकलं आणि सेनेचा प्रभावी विजय झाला. 90 मध्ये शिवसेनेचा महापौर आल्यानंतर बाळासाहेबांनी क्रांतिचौकातून सुवर्णमुकुटाची मिरवणूक काढत स्वहस्ते गणपतीला तो अर्पण केला. बाळासाहेबांप्रमाणेच अनेक दिग्गज राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार, उद्योगपती, अधिकारी, डॉक्टर, वकील आदी अगदी नित्यनेमाने गणपतीच्या पायावर नतमस्तक होण्यासाठी येतात.
संस्थान गणपतीचे सध्याचे ट्रस्टी प्रफुल्ल मालाणी सांगतात, मी स्वतः गणपतीची तीस-चाळीस वर्षांपासून अविरत सेवा करतो. कारण मला गणपतीने अनेक दृष्टांत दिले आहेत. विशेष सांगायचं म्हणजे, माझ्या सामाजिक- राजकीय कारकीर्दीतले अनेक टप्पे गणपतीच्या हक्काच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशीच पूर्ण झाले. मी नगरसेवक झालो, पिपल्स बँकेच्या चेअरमनपदी विराजमान झालो, इथला अध्यक्ष झालो अशी अनेक पदे मला चतुर्थीच्या दिवशी मिळाली. त्यामुळे या गणपतीचं स्थान माझ्या जीवनात मोलाचं आहे. संस्थान गणपतीच्या अशा प्रसादाची ख्याती सांगणारे अनेक ज्येष्ठ शहरात सापडतात. आपापली पात्रता आणि श्रद्धेनुसार अनेकजपण येथे गुप्तधनही दान करतात.
सुमारे 300 वर्षांपासून औरंगाबादकरांच्या श्रद्धेला जागणाऱ्या या मूर्तीवरील शेंदुर लेपनामुळे मूर्तीचा आकार बदलत गेला. अखेर मागील 17 ते 19 मे या काळात तब्बल 125 वर्षानंतर या मूर्तीचं वज्रलेपन करण्यात आलं. मूर्तीला आधी मूळ पाषाणरुपात आणलं गेलं आणि त्यानंतर शेंदूर लावण्यात आला. त्यानंतर विधीवत प्रतिष्ठापना करून गणपतीचं मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं.
शहरातील अनेक सामाजिक-राजकीय स्थित्यंतर अनुभवणाऱ्या या गणपतीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय कोणत्याही सण-उत्सव आणि मोठ्या मोहिमांना सुरुवात होत नाही. यंदाचा गणेशोत्सवही संस्थान गणपतीच्या साक्षीनं शांततेनं, संयततेनं आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन करून केला जाईल, असं वचन शहरातील गणेशभक्तांनी या गणरायाला दिलं आहे.
इतर बातम्या-