बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या घटमांडणीचे भाकित नुकतेच जाहीर झाले. यामध्ये राजा कायम आहे अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी कायम राहणार असल्याचं भाकित पुंजाजी महाराज वाघ (Punjaji Maharaj Wagh) यांनी व्यक्त केलं. तर यंदा सर्वच पिकांची परिस्थिती साधारण राहणार आहे. पावसाळ्यात जून आणि जुलैमध्ये पाऊस कमी राहणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस होण्याचा अंदाज भेंडवळच्या घटमांडणीत सांगण्यात आला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे (farmers in Vidarbha) प्रमुख असलेले कापूस पीक साधारण होणार आहे. देशात वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त उत्पादन होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशात रोगराईचे प्रमाण कमी राहणार आहे. देश आर्थिक संकटात (economic crisis) राहणार असल्याचं ही या भाकितात सांगण्यात आलंय. सुमारे साडेतीनशे वर्षापेक्षा अधिक कालखंडापासून भेंडवडच्या घट मांडणीची परंपरा आहे. भाकित ऐकण्यासाठी मोठया संख्येने शेतकरी हे भेंडवळमध्ये दाखल झाले होते.
शेतकऱ्यांच्या विश्वासाची असलेली प्रथा म्हणजे भेंडवळची घटमांडणी नुकतीच पार पडली आहे. भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य, पृथ्वीवरील संकटे, राजकारणाविषयी वर्षभराचा अंदाज वर्तवला जात असतो. त्यामुळे साहजिकच राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे डोळे भेंडवळच्या वार्षिक भाकिताकडे लागलेले असते. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत काल सायंकाळी 6 वाजता या घटमांडणीला प्रारंभ झाला होता. आज सकाळी या घटमांडणीची भाकित जाहीर केल गेलं. पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भेंडवळ या चार हजार लोकसंख्येच्या या गावात अक्षय तृतीयेला घट मांडण्याची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षापासून सुरू आहे असं ग्रामस्थ सांगतात. घटमांडणीची परंपरा सुरू करणारे चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज भाकित जाहीर करतात.
अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर आणि करडी अशा 18 प्रकारची धान्ये ठेवण्यात येतात. मध्यभागी 4 मातीचे ढेकळे ठेऊन त्यावर पाण्याने भरलेली घागर असते. घागरीवर पानसुपारी पुरी पापड चांडोली खुर्द भजे, वडे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर या ठिकाणी कोणीही जात नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे घटामध्ये झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकित वर्तविले जाते. त्यावरून पिकाचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी यंदा कोणती पिके घ्यायची हे ठरवत असतात चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली परंपरा पुंजाजी महाराज यांनी आजही कायम ठेवली आहे.