नागपूर, अमरावती विभागाला अद्यापही कोरोनाचा मोठा धोका? केंद्रीय पथकाचा सतर्कतेचा इशारा, मुख्यमंत्र्यांची सूचना काय?

| Updated on: Feb 08, 2021 | 8:18 PM

केंद्रीय पथकाने विदर्भातील चार जिल्ह्यांबाबत काही निरीक्षणं नोंदवली आहे. अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणासंदर्भात नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

नागपूर, अमरावती विभागाला अद्यापही कोरोनाचा मोठा धोका? केंद्रीय पथकाचा सतर्कतेचा इशारा, मुख्यमंत्र्यांची सूचना काय?
CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं दिसत असलं तरी नागपूर आणि अमरावती विभाला अद्यापही धोका कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. या पथकाने विदर्भातील चार जिल्ह्यांबाबत काही निरीक्षणं नोंदवली आहे. अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणासंदर्भात नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.(CM Uddhav Thackeray’s instructions to Nagpur, Amravati Divisional Commissioner)

केंद्रीय पथकाकडून आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या नविन रुग्ण संख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र शहरी भागापेक्षा नंदूरबार आणि भंडारा सारख्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे प्रमाण का वाढत आहे? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही, तरीही नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा अधिक सतर्क कराव्या अशी सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

रुग्णांची जिनॉमिक सिक्वेन्सची तपासणी होणार

या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, पथकाने ज्या भागातील पॉझीव्हीटी दर जास्त असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे त्याची दखल घेतली जाईल. त्यानुसार तेथील रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात येईल. याभागातील रुग्णांची जिनॉमिक सिक्वेन्सची तपासणी करण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील. टास्क फोर्सच्या माध्यमातून डॉक्टरांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येईल. त्याचबरोबर डेथ ऑडीट कमिटीचं कार्यही प्रभावीपणे करण्यात येईल असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.

केरळमध्ये 40, महाराष्ट्र 24 टक्के रुग्ण

देशात असलेल्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णसंख्येपैकी केरळमध्ये ४० टक्के तर महाराष्ट्रात २४ टक्के रुग्ण आहेत. त्याबाबत आढावा घेण्यासाठी एनसीडीसीचे संचालक डॉ. सुजीत सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचे पथक शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी मुंबईतील सायन हॉस्पिटल तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर येथे भेटी दिल्या. राज्यातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी मुंबई, ठाणे, पालघर भागात जास्त रुग्णसंख्या असून याभागातील नविन रुग्णांची संख्या घटत असल्याचे पथकाने सांगितले. विदर्भातील ग्रामीण भागात विशेषत अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात पॉझीटिव्हीटी दर जास्त आढळून येत असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदविले आहे.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय पथकातील सदस्य, तसंच राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यासही यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये समोर आलं धक्कादायक लक्षण, नाशिकमध्ये खळबळ

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्रच सरस; मृत्यूदर आणि सक्रीय रुग्णांची संख्या कमी

CM Uddhav Thackeray’s instructions to Nagpur, Amravati Divisional Commissioner