नंदुरबारः नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. नंदुरबारमध्ये एक दोन नव्हे तर जवळपास दहा हजार बालविवाह (10 thousand child marriages) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील जवळपास 2305 मुली या अठरा वर्षाच्या आतच आई झाल्याचीही माहिती आता समोर आली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभे (General meeting of Zilla Parishad) दरम्यान कुपोषणावरुन सुरु झालेल्या चर्चे दरम्यान महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतच्या कारणांची माहिती देत असतानाच बालविवाहाची आकडेवारी समोर ठेवेली. ही माहिती समोर आल्यानंतर उपस्थितींच्या भुवया उंचावल्या, तर फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाला माहीती देण्याच्या अनुषंगाने विभागाने बालविवाहाबाबत एक सर्वेक्षण केले होते.
यामध्ये कोरोनाच्या अडीच वर्षानंतर झालेल्या 52 हजार 773 महिलांचा विवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील 98.16 टक्के महिलांचा बालविवाह झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा आकडा 9 हजार 983 इतका असून राज्यात आता पर्यंतच्या बालविवाहाची ही सर्वात मोठी नोंद असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे यातील 4.37 टक्के म्हणजे 2305 महिला या अठरा वर्षाच्या आत गर्भवती झाल्या आहेत, आणि एक किंवा दोन मुलांच्या आई झाल्याची माहितीही समोर आली आहे. या आकडेवारीने प्रशासनच अचंभीत झाले असुन यापुढे असे बालविवाह होणार नाही यासाठी काळजी घेणार असल्याचे प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.
१८ वर्षाच्या आत विवाह झालेल्या महिलांची संख्या 9983 (18.96 टक्के) यामधील 18 वर्षाच्या आत माता झालेल्या महिलांची संख्या 2305 (4.37 टक्के) मुळातच बालविवाह रोखण्यासाठी ग्रामपातळीवर समित्या नेमल्या गेल्या आहेत. ज्या गावामध्ये बालविवाह झाले त्या गावातल्या ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि तलाठींना याबाबत काही माहिती असू नये याहून दुर्देवी ती बाब कोणती असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही काळात नंदुरबारमधल्या पोलीस प्रशासनानेदेखील बालविवाह रोखले आहेत. मात्र त्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेत पोलिसांना याबाबत कळवले आहे मात्र अडीच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात जर बालविवाह होत असतील तर प्रशासन आणि महिला बाल विकासविभाग करते तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आदिवासी समाजातील काही रुढी परंपरा याला कारणीभुत आहेतच मात्र त्याहूनही शिक्षणाचा अभाव, स्थलातंर, घरातील दारिद्र हे ही महिलांच्या शोषणाला कारणीभूत असून यातूनच बालविवाहाचे प्रमाणाधिक फोफावल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांना वाटत आहे.
राज्याची आतापर्यंतची आकडेवारी पाहता 10 हजार बालविवाहाचा हा आकडा सर्वात मोठा आकडा असेल, आणि याबाबत वरील यंत्रणांना काहीही माहिती असू नये यावरही आता शंका उपस्थित केली जात आहे. हा आकडा का वाढला आहे, आणि आशा अजून किती महिला असतील ज्या सर्वेक्षणात आल्या नसतील अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.