Video : विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे लाचेची मागणी, तहसीलदारांसोबत आमदारांनीच केलं स्टिंग ऑपरेशन!

| Updated on: Jun 14, 2021 | 10:14 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली तेव्हा विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे पैसे मागत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता एक धक्कादायक प्रकार मुक्ताईनगरमध्ये एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलाय.

Video : विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे लाचेची मागणी, तहसीलदारांसोबत आमदारांनीच केलं स्टिंग ऑपरेशन!
शेतकऱ्यांकडून लाच स्वीकारताना विमा कंपनी कर्मचाऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन
Follow us on

मुक्ताईनगर: चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. अशावेळी विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे लाच मागत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी करत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली तेव्हा विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे पैसे मागत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता एक धक्कादायक प्रकार मुक्ताईनगरमध्ये एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलाय. (Demand for bribe from insurance companies to farmers in Muktainagar)

मुक्ताईनगर तालुक्यात चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बजाज अलियान्स विमा कंपनीकडून तत्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी लाचेची मागणी केली जात असल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून उजेडात आलंय. महत्वाची बाब म्हणजे हे स्टिंग ऑपरेशन खुद्द खामदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन केलं आहे, तशी माहिती खुद्द पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. कर्की गावच्या शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर आमदार आणि तहसीलदारांनी मिळून हा धक्कादायक प्रकार उजेडात आणलाय.

वेष बदलून अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं

विमा कंपन्यांचे प्रतिनिधींची शेतकऱ्यांसोबत बैठक सुरु असताना अधिकाऱ्यांनी वेष बदलून या बैठकीत प्रवेश केला. त्यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी 28 हजार रुपयांची लाच स्वीकारताच दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आलं. विमा कंपनीकडून एका गावात जवळपास 5 लाख रुपयांची लाच गोळा केली जात असल्याचा गंभीर आरोप आमदार चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकाराबाबत आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

विमा कंपन्यांकडून पैशाची मागणी, फडणवीसांचा आरोप

जळगाव जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची स्थिती वाईट झाली आहे. मागच्या नुकसानाचे पैसे अजून मिळाले नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. कोकणात सरकार धावलं पण आपल्याकडे दुर्लक्ष होत आहेत. पीक विमा उतरवला जात नाही. विमा कंपन्यांचे लोक पोहोचत नाहीत. जिथे जातात तिथे कमी नुकसान दाखवत आहेत. योग्य नुकसान दाखवण्यासाठी त्या लोकांकडून पैशांची मागणी होतेय. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केलीय.

संबंधित बातम्या :

Modi cabinet expansion 2021 : नारायण राणे, प्रीतम मुंडेंना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता किती?

मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, नाना पटोलेंचं रोखठोक मत, 5 वर्ष मुख्यमंत्री कोण?

Demand for bribe from insurance companies to farmers in Muktainagar