अमृता फडणवीस यांचा भन्नाट उखाणा, फक्त उखाण्याचीच जोरदार चर्चा; असं काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

| Updated on: Feb 06, 2024 | 12:16 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जेवढे चर्चेत असतात, तेवढ्याच चर्चेत त्यांची पत्नी, अमृता फडवणीस याही असतात. त्यांची गाणी, अल्बम्स यासह रोखठोक भूमिका आणि वक्तव्य यासाठीदेखील अमृता फडणवीस ओळखल्या जातात. बऱ्याच वेळा त्या स्पष्ट बोलून, तर कधी टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधतात.

अमृता फडणवीस यांचा भन्नाट उखाणा, फक्त उखाण्याचीच जोरदार चर्चा; असं काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
Follow us on

नागपूर | 6 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जेवढे चर्चेत असतात, तेवढ्याच चर्चेत त्यांची पत्नी, अमृता फडवणीस याही असतात. त्यांची गाणी, अल्बम्स यासह रोखठोक भूमिका आणि वक्तव्य यासाठीदेखील अमृता फडणवीस ओळखल्या जातात. बऱ्याच वेळा त्या स्पष्ट बोलून, तर कधी टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधतात. यावेळी मात्र त्यांनी विरोधकांवर अनोख्या पद्धतीने निशाणा साधला आहे, तोही खास उखाण्यामधून… त्यांच्या याच उखाण्याची सर्वत्र चर्चा दिसून आली.

नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप-मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला.

उखाण्यातून विरोधकांवर निशाणा

तेव्हा त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह करण्यात आला. अमृता फडणवीस यांनी एक खास उखाणा घेतला, आणि त्यासह विरोधकांना टोलाही लगावला. ” देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण.. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण” असा खास उखाणा त्यांनी घेतला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांनी त्यांच्या या उखाणा आणि टोल्याला टाळ्या वाजवून दाद दिली.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. आधीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याची टीका सत्ताधारी पक्षांकडून केली जाते. त्याला विरोधी पक्षांकडूनही तेवढ्याच जोरकसपणे प्रत्युत्तर दिलं जातं. त्यातच आता अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या उखाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

गाणंही गायलं

यावेळी कार्यक्रमात उपस्थित महिलांशी अमृता फडणवीस यांनी संवाद देखील साधला. तसेच महिलांच्या आग्रहाखातर त्यांनी एक गाणंही गायलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारांच्या महिलांसाठी असणाऱ्या अनेक योजना त्यांना समाजात सन्माने उभं राहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं.