भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पिकाला सलग तीनदा अतिवृष्टीचा (heavy rain) फटका बसल्याने पीक उद्ध्वस्त झाले. शेतातील पीक नष्ट झाल्याने आता पुढे काय करायचं या विवंचनेतून शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. गोविंदराव महादेव दानी वय 67 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं (farmer) नाव आहे. ते लाखांदुर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथील रहिवासी होते. घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोविंदराव दानी यांची किन्ही गुंजेपार शिवारात 6 एकर शेती आहे. त्यांनी आपल्याशेतात धानासह इतर काही पिकांची लागवड केली होती. मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट अशा सलग तीन महिन्यांमध्ये त्यांच्या पिकाला पुराचा फटका बसला.
गोविंदराव दानी यांच्या शेतातील पीक तीनदा पुराच्या पाण्याखाील गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. पिकावर करण्यात आलेल्या हजारो रुपये खर्च वाया गेला. पिकाचे नुकसान झाल्याने आता पुढे काय करायचं या विवंचनेत ते होते. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली.
पहाटे घरातील सर्व मंडळी झोपेत असताना ते आपल्या शेतात पोहोचले. त्यानंतर त्यांनी तेथील आंब्याच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा शेतात गेला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
गोविंदराव दानी यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
भंडारा जिल्ह्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन महिन्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. हजारो हक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदा पुराचा सर्वाधिक फटका हा विदर्भाला बसला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती भीषण बनली होती.
हजारो हेक्टरवरील पिरे नष्ट झाली. तर अनेकांवर अतिवृष्टीमुळे स्थलांतरणाची वेळ आली. मराठवाड्यात देखील पावासमुळे मोठे नुकसान झाले.