मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सकाळी मान्सून (Monsoon) राज्यातून परतला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. याबाबत हवामान विभागाकडून (weather department) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता नाही. मात्र ओडीशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सित्रांग चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे त्याचा फटका या दोन राज्यांना बसण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
यंदा राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या ऐन हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला बसला. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. परतीचा पाऊस आणखी किती दिवस पडणार याची चिंता शेतकऱ्याला होती. मात्र मान्सून राज्यातून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान दुसरीकडे दक्षिण अशियाई हवामान परिषदेमध्ये यंदा भारतात डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र आता राज्यातून मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे ओडीशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सित्रांग चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे त्याचा फटका या दोन राज्यांना बसण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.