पावसाचं पुन्हा धुमाशान; पुढील 48 तासात “या’ भागात जोरदार बरसणार…

| Updated on: Oct 07, 2022 | 10:47 PM

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असला तरी सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र परतीचा मान्सून पुढील तीन-चार दिवस जोर दाखवण्याची शक्यता आहे.

पावसाचं पुन्हा धुमाशान; पुढील 48 तासात या भागात जोरदार बरसणार...
पावसाची खबरबात
Follow us on

मुंबईः सध्या देशातील अनेक भागात पाऊस कोसळत असला तरी महाराष्ट्रातही अनेक भागात पाऊस थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.  भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये आयएमडीने (IMD) मुंबईसह आसपासच्या परिसराला यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

परतीच्या मान्सूनमुळे राज्याच्या इतर भागातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. पावसाबरोबरच 30 ते 40 किमी जोरदार वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मुंबईसह परिसरात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा हे जिल्हे वगळता हवामान खात्याकडून संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असला तरी सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र परतीचा मान्सून पुढील तीन-चार दिवस जोर दाखवण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई आणि परिसराव्यतिरिक्त पुणे, नाशिक, सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक भागांतही जोरदार पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

सध्या पीक काढणीचा काळ सुरू असल्याने शेतकऱ्यांची पिकं पाण्यात जाण्याची चिंता सतावत आहे. विशेषत: नांदेड आणि परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अनेक पिकं शेतातच भिजून गेली आहेत.

साधारणपणे मुंबईत 8 ऑक्टोबरपर्यंत आणि महाराष्ट्राच्या काही भागात 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा मुक्काम असतो. मात्र यावेळी मान्सून आणखी काही दिवस राज्यात थांबणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रादेशिक हवामान खात्याकडून मुंबईत 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतण्याची तारीख दिली असली तरी महाराष्ट्रातील इतर भागात तो किती दिवस थांबणार आहे याबाबत अजून तरी काहीही सांगण्यात आलेले नाही.

सोमवारी मात्र 10 ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.