हिंगोलीः वसमत तालुक्यातील (Vasmat) चोंढी स्टेशनकडून (Chondhi Station) कुरुंद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गेट क्रमांक 163 रेल्वे रूळ ओलांडून पलिकडे जाता येते. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये आणि प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून रेल्वे विभागाच्यावतीने रेल्वे मार्गाखाली भुयारी पूल (Underground bridge under railway line) बांधण्यात आला आहे. मात्र पुलाची रचना चुकीची केल्याचा आरोप करत हा भुयारी मार्ग आहे की स्वीमिंग पूल आहे असा सवाल आता प्रवाशांसह परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या भुयारी पुलात 20 फुटापर्यंत पाणी साचले असल्याने भुयारी मार्गात पाणीच पाणी झाले आहे. या भुयारी मार्गातील पाण्यामुळे वाहन चालकांसह विद्यार्थी व शेतकरी, दुधवाले यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे आल्यानंतर ज्या वेळी फाटक पाडले जाते त्यावेळी पुन्हा काही काळ नागरिकांना तिथेच अडकून बसावे लागत आहे. रेल्वे विभागाने पैसे खर्च करून बांधलेला पुलामुळे मात्र शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
या पुलामुळे शेतात जाणाऱ्या वाटा बंद झाल्या आहेत. हा रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताना लांबच्या मार्गाने जावे लागत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाण्याचा जो रस्ता होता तोच रस्ता पुन्हा करुन देण्याची मागणी वसमत तहसीलदारांकडे करण्यात आली होती.
त्यानंतर वसमतचे तहसीलदार अरविंद बौळगे यांनी पत्रव्यवहार करून राज्य शासनाकडून परवानगीही घेतली होती. तर आता मात्र रेल्वे विभागाकडून परवानगी देण्यास टाळ टाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
शेतात जाण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने हा रस्ता तात्काळ मोकळा करुन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना रस्त्यामुळे शेतीच्या कामामध्ये फटका बसत असल्याने रेल्वे विभागाच्या प्रशासनावर जोरदार टीका केली जात आहे.