मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : आज 13 फेब्रुवारी… आजच्या दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. येत्या 15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. देशातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेती प्रश्नांना घेऊन देशातला शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सीमा सील केल्या आहेत. शिवाय कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 1 मार्चला सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केलीय. संबंधित प्रकरण सुप्रीम कोर्टातच राहणार की मुंबई हायकोर्टात जाणार याचा निर्णय 1 मार्चला होणार आहे.
भाजप लवकरच महाराष्ट्रासाठी राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा करू शकते. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे आणि पियुष गोयल यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार नाही. अशोक चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे भाजपचे उमेदवार असू शकतात, तर मुंबईतील सर्वात सुरक्षित जागेवरून पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचे अबुधाबी येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी म्हणाले, यूएई आणि भारतामध्ये मजबूत संबंध आहेत. युएई हे माझ्या घरासारखे आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी उद्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्यासोबत असतील. यात्रेतून एक दिवसाची विश्रांती घेऊन राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत दिल्लीत येत आहेत.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी राष्ट्रीय सरचिटणीसपद सोडले आहे.
राहाता/अहमदनगर | उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेतील सभेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
राहाता येथे थोड्याच वेळात होणार उद्धव ठाकरे यांचे सभा स्थळी आगमन होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सभेआधी अचानक शिर्डीत जाऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
मुंबई | उपमुख्यमंत्र्याचे बनावट लेटरहेड, सही आणि ईमेल बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड समोर आला आहे.
बदली आदेशासाठी उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड आणि बनावट सहीचाही वापर केला जात असल्याचं उघड झालं आहे. गृह विभागानेच याबाबत परीपत्रक काढून माहीती दिली आहे. बनावट ईमेल, लेटरहेड आणि सहीच्या वापरानंतर राज्य सरकार खडबडुन जागे झाले आहे. त्यामुळे सर्व विभागांना अधिकृत ईमेल वापरणे बंधनकारक केलं आहे. तसेच आता Gmail, आणि इतर खाजगी मेलचा वापर शासकीय विभागांना करता येणार नाही.
पुणे | लोकसभा निवडणुकीची लवकर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना युद्धपातळीवर सुरू आहेत. दुर्गम भागातील मतदान केंद्रावर इंटरनेटची सुविधा उपलब्ध करा, असे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आढावा बैठकीत दिले. तसेच मतदान केंद्रावर मतदान सुरु असताना माहिती भरणे , अॅपवर तक्रार नोंदवता यावी यासाठी नेटची सुविधा तयार करण्याचेही आदेश दिले.
लोकसभा निवडणुकीची लवकर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना युद्धपातळीवर सुरू आहेत. दुर्गम भागातील मतदान केंद्रावर इंटरनेटची सुविधा उपलब्ध करा असे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आढावा बैठकीत दिले. मतदान केंद्रावर मतदान सुरु असताना माहिती भरणे, अँपवर तक्रार नोंदवता यावी यासाठी नेटची सुविधा तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मुंबई : १६ आणि १७ तारखेला शिवसेना शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारणी परिषद होणार आहे. कोल्हापूरमध्ये ही दोन दिवसाची परिषद होणार आहे. यावेळी शिवसेनेची ताकद दिसणार आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार, राष्ट्रीय नेते या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस कोल्हापूरात राहणार आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांची भव्य सभा होणार आहे.
जालना : जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आले आहेत. यावेळी जरांगे पाटील यांनी अजित पवार, छगन भुजबळ यांचा घोटाळा मागे घेतला. नालायक औलादी काय सरकार चालवता? पाच महिने झाले प्रक्रिया सुरू आहे. फक्त प्रक्रिया सुरू आहे. शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत. तुम्हाला राज्य शांत बघायचे नाही का? अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मुंबई : अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार हे मी १३ एप्रिलला सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी माझ्यावर टिका केली होती की संजय शिरसाट हे ज्योतिष झालेत. पण, आज हे भाकित खरं ठरलं. फेब्रूवारी महिन्यातील हा पंधरवाडा ब्रेकिंग न्युजचा असेल. आमच्याही पक्षात इनकमिंग जोरात आहे. दोन दिवसांत पाहा की किती नेते शिवसेनेत येणार आहेत. संजय राऊत हाच किती दिवस ऊबाठात राहिल हे सांगता येत नाही. तुम्ही पाहा की ते ही लवकरच इतर पक्षात जातील. ठाकरेंची साथ सोडतील असे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले.
जळगाव : चाळीसगावचे भाजप माजी नगरसेवक खून प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी दोन आरोपींना पुणे येथील लोनिकंद परिसरातून जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सचिन सोमनाथ गायकवाड व अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख अशी अटकेतील दोन्ही आरोपींची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव आश्रम शाळेतील 96 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. सकाळचे दूध पिल्याने या मुलांना विषबाधा झाली. खुलताबाद येथे ही शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं. पण, तुम्ही आता पक्ष सोडून जाताय. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला स्वीकारणार नाही. आयाराम गयाराम सारखी अवस्था झाली आहे. त्यानी सांगायला हवे की त्यांच्यावर ईडीचा दबाव आहे. वरिष्ठ नेत्यांचा त्रास आहे? पण काही बोलले नाहीत. प्रधानमंत्री यांनी अशोक चव्हाण यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले मात्र आता सगळं साफ झालं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जे भेटतात त्यांचा घोटाळा साफ होतो अशी टीका कॉंग्रेस प्रभारी रमेश चेनिथला यांनी केली.
पुण्यात पार्वती पोलीस स्टेशनची धडक करावाई. कर्नाटकातील कुख्यात गुंडासह तीन जनांना घेतलं ताब्यात. तीन गावठी पिस्तुल आणि २५ जिवंत काडतुसे केली जप्त. ११ लाख ९० हजाराचा मुद्देमाल केला जप्त. गोळीबाराच्या घटनेनंतर पुण्यात गुंडांवर करडी नजर आहे. बेकायदेशीर शस्त्र वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरु आहे.
जालना : जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा आज चौथा दिवस. जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आणि बघण्यासाठी आलेल्या महिला आक्रमक. सरकार जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याने महिला आक्रमक.
अहमदनगर : छोटेखानी सत्कार असताना एवढा मोठा जनसमुदाय उद्धव ठाकरे यांच्या स्वागतास जमला. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. ही आगामी काळाची नांदी आहे. आजही गलिच्छ राजकारण सुरू आहे. जनतेला हे आवडलेलं नाही. भाजप इडी, सीबीआय तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर आहे.
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भांबर्डे एकोले गाव परिसरात अचानक लागेलल्या वणव्यात पर्यटकांची ९ वाहनं जळून खाक झाली. एकोले गावातील लोटस पॉईंट जवळ ही घटना घडली. लोटस पॉईंटवर पर्यटक गाडी लावून फिरायला गेले असताना, परिसरात असणाऱ्या सुकलेल्या गवतला अचानक आग लागली, या आगीत 7 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहन जळून राख झाली.
‘ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर मी इम्प्रेस आहे. मी प्रभावित आहे. त्यामुळे मी पक्षात प्रवेश करत आहे’, असा शब्दांत अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाचे कारण स्पष्ट केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काहीही फरक पडणार नाही.अशोक चव्हाण एवढे मोठे नेते नाहीत की ज्यामुळे मराठवाड्यात त्यांचा भाजपला फायदा होईल. अशोक चव्हाण स्वतः दोन वेळा पराभव झालेला आहे. ते अजूनही नांदेड मधून निवडणुकीला उभे राहायला घाबरत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाने फार तर नांदेड शहर आणि ग्रामीणमध्ये फायदा होईल पण मराठवड्याला त्याचा फार फटका बसणार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे राज्यसभेला काहीही फरक पडणार नाही.भाजप कमजोर झालेला पक्ष आहे त्यामुळे त्यांना इतर पक्षातील लोक भाजपत घ्यावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेल. पक्ष जो आदेश देईल, फडणवीस जे सांगतील ते काम करणार आहे. मी काही मागणी केली नाही. मला जे काही सांगितलं जाईल ते करेल, अशी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
विदर्भातील शेतकऱ्यांना धनाला 20 हजार रुपये बोनस देण्याची सरकारची घोषणा अद्यापही प्रलंबित असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. विदर्भात सभा घेत असताना आम्ही धानाला बोनस दिले असे मुख्यमंत्री सभेमध्ये सांगत आहेत मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्यापही बोनस मिळाला नाही असा आरोप त्यांनी केला. महायुती सरकार ही शेतकरी विरोधी असल्याची टीका त्यांनी केली.
पुण्यात तरुणाने स्वतःला पेटवून घेतले आहे. पुण्यातील वाघोली भागातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस स्टेशन समोरच तरुणाने पेटवून घेतले आहे. पोलिसांनी तक्रार दाखल न केल्याच्या रागातून पेटवून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे. नांदेड मधील भाजप कार्यालयासमोर बॅड वाजवत व फटाके फोडून भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने नांदेड आणि मराठवाड्यात भाजपची ताकद वाढेल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांना आहे.
चव्हाणांच्या प्रवेशामुळे आमची ताकद वाढेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण राज्यसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जातंय. नाना पटोले यांना गांर्भियाने घेऊ नका असे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
भाजपामध्ये जोमाने काम करेल, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनी केला भाजपामध्ये प्रवेश. यावेळी चंद्रकांत बावनकुळे, आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.
आजचा दिवस भाजपासाठी आनंदाचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण आणि चंद्रकांत बावनकुळे यांची पत्रकार परिषद सुरू झालीये.
अशोक चव्हाण भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी जय्यत तयारी करण्यात आही आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले मनोज जरांगे यांची तब्बेत खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात अशोक चव्हाण यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण उद्या राज्यसभेचा अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नगरच्या सोनई गावात उद्धव ठाकरे यांची सभा आहे. सभास्थळी उद्धव ठाकरे पोहचले आहेत. ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात येत आहे.
राज्यसभेच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहिर होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन दिवसआधीच अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश करण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
अशोक चव्हाण आज 1 वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, मात्र त्याआधी सागर बंगल्यावर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यासाठी रवाना झाले आहे आहेत.
अशोक चव्हाण आज दुपारी 1 वाजता भाजप पक्ष कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करतील. यासाठी भाजप कार्यालयात जय्यत तयारी सुरू आहे. अशोक चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचा अर्ज भरला जाणार आहे.
अमित शहा यांच्या सभेची संभाजीनगरात जय्यत तयारी करण्यात येत आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. 15 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता अमित शहा यांची सभा होणार आहे. सभेसाठी 40 बाय 80 चा मंच उभारण्याचं काम सुरू आहे. भागवत कराड आणि अतुल सावे यांच्याकडून सभेच्या तयारीची पाहणी सुरू आहे.
पुण्याच्या ध्वनी प्रदूषणाची थेट उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. पुण्यातील ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेची न्यायालयात सुनावणी आहे. राज्य सरकार प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे पोलिसांना न्यायालयाने नोटीस जारी केल्या आहेत. पुण्याच्या दोन्ही प्रदूषणाबाबत गंभीर व्हा आणि अहवाल लवकर सादर करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मी पक्षप्रवेशासाठी निघालो आहे. आज मी भाजपात प्रवेश करणार आहे. आज नव्या राजकीय आयुष्याची सुरुवात होतेय, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे. घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्याच्या विरोधात याचिका केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादीची लढाई आता सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे.
नागपूर- अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनोसी प्रमाणपत्राची मागणी केली. 12,300 रुपयांची थकबाकी अशोक चव्हाण यांच्याकडून लगेच भरण्यात आले. यामुळे चव्हाण यांना घाईघाईची एनओसी घेणं म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचीही चर्चा आहे. रविवारी मुक्कामी आलेल्या एका व्यक्तीने बांधकाम विभागाची एनओसी मिळवण्यासाठी पैसे भरत एनओसी मिळवली आहे. साधारणपणे खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसची एनओसी आवश्यक असते.
नवी दिल्ली- बवाना स्टेडियम आता कारागृह बनणार आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. दिल्ली सरकारला केंद्र सरकारने हा प्रस्ताव दिला आहे. अटक केलेल्या शेतकऱ्यांना बवाना स्टेडियममध्ये ठेवलं जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा आज अहमदनगर जिल्हा दौरा… शनिशिंगणापूर येथे शनी दर्शन आणि अभिषेक करून दौऱ्याला होणार सुरुवात… साडेअकरा वाजता सोन येथे पहिला जनसंवाद मेळावा, तर राहुरी येथे भव्य सत्काराचे आयोजन, त्यानंतर दुपारी 3 वाजता श्रीरामपूर येथे सभा… उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून देखील तयारी…
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फटका वाहतुकीला.. दिल्लीसह NCR मध्ये ट्रॅफिक जॅम… अनेक रस्त्यांवर हजारो वाहन अडकली…. दिल्लीत येणारे जाणारे रस्ते जॅम… सिंघू, टीकरी, गाझिपूर बॉर्डरवर मोठा पोलीस बंदोबस्त…
जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य पथक अंतरवालीत.. नाडी, BP तपासणी करू द्यावी जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांची जरांगे पाटील यांना विनंती… जरांगे पाटील यांच्याकडून मात्र तपासणी करण्यास नकार
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर राऊतांची टीका… अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते. शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच अशोक चव्हाण देखील पक्ष सोडणार होते… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
रत्नागिरी- आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अंतिम निर्णय होणार आहे. काल दोन्हीकडील युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. न्यायालयाने राजन साळवी यांची पत्नी आणि मुलगा यांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांच्या अटकपुर्व जामिन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर राजन साळवींच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. एसीबीने राजन साळवी यांच्यासह पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील डोनदिगर येथे अज्ञात हल्लेखोरांनी एका घरावर गोळीबार केला. डोनदिगरचे रहिवासी कैलास पाटील यांच्या घरावर आज पहाटे साडेतीन ते चार वाजता दरवाजावर दोन राउंड फायर करण्यात आले. कुटुंबामध्ये झालेल्या जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. बंद दरवाजावर गोळीबार करण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी काडतूस सापडले. गोळीबाराच कोणीही जखमी झालेले नाही.
पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला भीषण आग लागली. काल मध्यरात्री २च्या सुमारास ही आग लागली , त्यामुळे इतर दोन डब्यांनाही झळ पोहोचली. त्यांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाची चार वाहने घटनास्थ्ळी पोहोचली आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुणे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असून त्यांनी ओझर येथे गणरायाचे दर्शन घेतले. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे.
हवामानाचा अंदाज वर्तवणारे देशातील 199 तर राज्यातील 11 केंद्र होणार बंद. बदलत्या हवामानापासून शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान टाळण्यासाठी होत होती मदत. जिल्हा कृषी हवामान केंद्र होणार बंद. केंद्र सरकारचा निर्णय, तर कृषी हवामान तज्ञ जाणार न्यायालयात.
गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भविकांची पहाटेपासून गर्दी. मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं अयोजन. पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला. गणेशजयंती निमित्त मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजावण्यात आलय. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी पुष्पवृष्टी देखील केली जाणार.
अशोक चव्हाण यांचा आजच भाजपात पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. दुपारी 12.30 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होणार आहे.
राजकारणात पक्षात बदल होत असतात. एक व्यक्ती गेली म्हणजे पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला असं समजण्याचा कारण नाही नक्कीच नाही. या परिस्थितीतून काँग्रेस नव्याने उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहील. माझ्या संदर्भात काही वावड्या पसरवण्याचा काम सुरू होते. अमरावतीचा रवी राणाची प्रवृत्ती निष्ठा बदलून विष्टा खाण्याची आहे, अशी बोचरी टीका रवी राणा यांच्यावर केली.
शरद मोहोळ हत्या प्रकरणात अटक केलेल्या दोन वकिलांसह सात आरोपींना १७ फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी ठोठावण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपी आता मोक्का कोठडीत आहेत. त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. मोहोळच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या आरोपींना काल प्रथमच मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं.
येरवडा कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी घडली. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगेश विठ्ठल भोर (वय ३०, रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. भोर याच्याविरुद्ध ओतूर पोलिस ठाण्यात एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहेत. न्यायालयाने त्याची १६ जुलै २०२३ रोजी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. राज ठाकरे आज पुणे ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत. ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन देवस्थानाच्या विविध विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. राज ठाकरे आज 12 वाजता ओझरला दाखल होणार आहेत. राज ठाकरे ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा विश्वजीत कदम यांनी लढवावी, अशी काँग्रेस पक्षाची इच्छा आहे. मात्र विश्वजीत कदम लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत.
आपल्या मागण्यांना घेऊन देशातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. एमएसपी हमी, कर्जमाफी, स्वामीनाथन अहवालातील तरतुदींच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. सरकारने या मागण्या मान्य कराव्यात यासाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा ते दिल्लीपर्यंतच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. काटेरी तारा लावून शेतकऱ्यांना रोखण्याची तयारी आहे. राजधानी दिल्लीत कलम 144 देखील लागू करण्यात आलं आहे.