महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागांवर मतदान झालं. ज्यात अमरावतीकडे खास नजरा आहेत. इथं भाजपच्या नवनीत राणांविरुद्ध काँग्रेस बळवंत वानखडे अशी थेट लढत आहे. तर प्रहारच्या दिनेश बुब यांच्यामुळं अमरावतीत चुरस निर्माण झाली. मतदान करण्यासाठी रवी राणांनी नवनीत राणांना बुलेटवरुन मतदान केंद्रावर आणलं. तर काँग्रेसच्या बळवंत वानखडेंनी एकतर्फी लढत असल्याचं म्हटलंय. अमरावतीनंतर लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ-वाशिम. भावना गवळींना तिकीट नाकारुन शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील मैदानात आहेत. संजय देशमुखांनी कुटुंबासह चिंचोली गावात मतदानाचा अधिकार बजावला आणि निकालाच्या दिवशी मशालच पेटलेली असेल असा दावा केला.
अकोल्यातही तिरंगी लढत आहे. भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील तर वंचितकडून स्वत: प्रकाश आंबेडकर मैदानात आहेत. आपण मोठ्या फरकानं विजयी होऊ, असा दावा धोत्रेंनी केला. तर धोत्रे आणि प्रकाश आंबेडकरांनी आधीच हार मानल्याचं काँग्रेसच्या अभय पाटलांनी म्हटलंय. हिंगोलीतही शिवसेनेच्याच 2 गटात सामना आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकरांनी आष्टी गावात मतदान केलं. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकरांनी हदगावात मतदान केलं.
बुलडाण्यातही शिवसेनेच्या दोन्ही गटात थेट लढत असली तरी शेतकरी नेते रविकांत तुपकरही लोकसभेच्या रिंगणात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांनी गजानन महाराजांचं दर्शन घेत कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला. प्रतापराव जाधवांनी मादनी मतदान केंद्रावर मतदान केलं. तर रविकांत तुपकरांनी सावळा गावात मतदान केलं.
परभणीतून यावेळी महायुतीकडून रासपचे उमेदवार स्वत: अध्यक्ष महादेव जानकर आहेत. सकाळपासूनच गाडीतच झुणका भाकरची न्याहारी करत जानकरांनी मतदान केंद्रावर भेटीगाठी दिल्या. जानकरांचा सामना इथं ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय जाधवांशी आहे. वर्ध्यात भाजपचे रामदास तडस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमर काळे रिंगणात आहेत. तडसांनी देवळी गावात मतदानाचा अधिकार बजावला. तर अमर काळेंनी हैबतपूर इंथ मतदान केलं.
नांदेडमध्ये भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसच्या वसंत चव्हाणांमध्ये लढत आहे. नांदेडमध्ये उमेदवार पुन्हा विद्यमान खासदार चिखलीकर असले तरी, इथं काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला आहे. आतापर्यंत 2 टप्प्यातील मतदानात विदर्भातील सर्व 10 जागांवर मतदान झालंय. महाराष्ट्रात एकूण 13 जागांवर मतदान झालं. यापैकी 10 जागा महाविकास आघाडी जिंकणार असा दावा राऊतांनी केलाय. आता तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 मे रोजी असेल. ज्यात पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघासह एकूण 11 जागांवर मतदान होईल. विशेष म्हणजेत बारामतीसाठी मतदान असेल.