नदीच्या स्वच्छतेसाठी सलग 18 दिवस आंदोलन, अखेर पालकमंत्र्याकडून दखल, उल्हास नदी स्वच्छ होणार !

| Updated on: Feb 27, 2021 | 7:05 PM

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या 18 दिवसांपासून नदी पात्रात सुरु असलेले आंदोलन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे (Eknath Shinde meet Nitin nikam who protest for Ulhas river cleaning).

नदीच्या स्वच्छतेसाठी सलग 18 दिवस आंदोलन, अखेर पालकमंत्र्याकडून दखल, उल्हास नदी स्वच्छ होणार !
Follow us on

कल्याण (ठाणे) : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या 18 दिवसांपासून नदी पात्रात सुरु असलेले आंदोलन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. नदी पाण्यावर उगविलेले जलपर्णी काढण्यासाठी लागणारी मशीन तातडीने मागविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनास दिले आहे. दरम्यान पाण्यावरील जलपर्णी मॅन्यूअली काढण्याचे काम सोमवारपासून सुरु केले जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले (Eknath Shinde meet Nitin nikam who protest for Ulhas river cleaning).

मी कल्याणकर संस्थेच्यावतीने नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावर यांनी नदीपात्रात आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनास सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना आज पालकमंत्री शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण तहसिलदार दीपक आकडे, कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पवार यांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुरु असेलल्या आंदोलनास भेट दिली.

“मशीन लावून तातडीने जलपर्णी हटवण्याचे काम सुरू होईल. तसेच 31 मे पर्यंत एसटी प्लांट उभारून नदीत मिसळणारे विनाप्रक्रिया सांडपाणी बंद करण्यात येईल. आंदोलन करणाऱ्यांना तातडीच्या काय उपाययोजना केल्या जातील”, असं पालकमंत्र्यांनी सांगितलं. यावळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर प्रतिक्रिया दिली.

संजय राठोड राजीनामा देणार?

यावेळी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राठोड यांची चौकशी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत योग्य तो निर्णय घेणार आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘कोरोना अद्याप संपलेला नाही’

कल्याणमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “कोरोना अद्याप संपलेला नाही. सर्वानी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मास्क घातला पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे. आंदोलन करताना कोरोना नियम पाळले पाहिजे. मध्यल्या काळात कोरोना कमी झाला होता. दुदैवाने त्याचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

‘एनआरसी कामगारांवर अन्याय होणार नाही’

एनआरसी कामगार थकीबाकीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहे. यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हणणो आहे की, “एनआरसी कामगारांवर अन्याय होणार नाही. जी काही देणी आहेत. दिली पाहिजेत यासाठी नक्की प्रयत्न केला जाईल.” शिंदे यांनी नंतर कामगारांची भेटही घेतली.

हेही वाचा : मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, अभिजीत बिचुकलेंचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र