Loadshedding : लोडशेडिंग टाळण्यासाठी महावितरणचा मेगाप्लॅन; वॉर रूम सुरू, प्रत्येक तासाला आढावा

| Updated on: Apr 24, 2022 | 12:51 PM

कोणत्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून व कोणत्या स्रोताकडून प्रत्येक तासाला किती वीजपुरवठा उपलब्ध होत आहे, याकडे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मागणीएवढी वीज उपलब्ध होईल यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. तसेच काही कारणांमुळे मागणी व उपलब्धततेत तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

Loadshedding : लोडशेडिंग टाळण्यासाठी महावितरणचा मेगाप्लॅन; वॉर रूम सुरू, प्रत्येक तासाला आढावा
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us on

नाशिकः विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणने (MSEDCL) केलेले सूक्ष्म नियोजन फलदायी ठरले असून, मागणीएवढा वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात विजेचे भारनियमन (Loadshedding) आटोक्यात आले असून, सर्वच वर्गवारीतील फिडरवर अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे, अशी माहिती महावितरणच्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक (Nashik) विभागातून देण्यात आली. महाराष्ट्रासह देशातील 10 राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार व झारखंड आदी राज्यांत विजेचे साधारणतः 10 ते 15 टक्के भारनियमन केले जात आहे. परंतु महावितरणकडून करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांमुळे विविध स्रोतांकडून अतिरिक्त स्वरूपात पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करण्यात आली आहे. त्याची फलश्रुती म्हणून महाराष्ट्रात विजेच्या उच्चांकी मागणीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करण्यात महावितरणला यश आले आहे, असा दावा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतल्या बैठका

राज्यातील विजेचे तात्पुरते भारनियमन कोणत्याही परिस्थितीत टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत सातत्याने बैठका घेऊन आवश्यक उपाययोजना वेगाने व ताबडतोब करण्याची सूचना दिल्या. ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे बैठकांना उपस्थित होते. राज्यातील ग्राहकांना अखंडित वीज मिळेल याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्रीठाकरे यांनी दिले. त्यानंतर ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने विजेची मागणी व उपलब्धता याचे सूक्ष्म नियोजन केले आहे.

काय केले नियोजन?

कोणत्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून व कोणत्या स्रोताकडून प्रत्येक तासाला किती वीजपुरवठा उपलब्ध होत आहे, याकडे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मागणीएवढी वीज उपलब्ध होईल यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. तसेच काही कारणांमुळे मागणी व उपलब्धततेत तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. या प्रयत्नांमुळे महावितरणने भारनियमनाचे योग्य व्यवस्थापन करून विजेची उपलब्धतेमध्ये वाढ करण्यात यश आले आहे. कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरळीत वीज पुरवठ्याची हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

सध्या कशी मिळतेय वीज?

महावितरणची शनिवारी दुपारी 4 वाजता 24 हजार 877 मेगावॅट विजेची मागणी होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून 7380 मेगावॅट, केंद्राकडून 6102 मेगावॅट, उरण गॅसमधून 213 मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून 1134, सीजीपीएलकडून 622 मेगावॅट, जीएमआरकडून 200 मेगावॅट, अदानीकडून 2951 मेगावॅट, रतन इंडियाकडून 1200 मेगावॅट, पॉवर एक्सचेंजमधून 426 मेगावॅट, साई वर्धाकडून 240 मेगावॅट, बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून 1226 मेगावॅट, राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून 915 मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांकडून 85 मेगावॅट,सहवीज निर्मितीतून 996, लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून 227 मेगावॅट, रिअल टाइम मार्केटमधून 424 मेगावॅट वीज उपलब्ध झाली. त्यामुळे राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करता आला. येत्या काळात सुद्धा ही परिस्थिती कायम राहील यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून तासागणिक आढावा घेतला जात आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!