सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी ‘पहाटे’चा मुहूर्त निश्चित केला नाही… अमित ठाकरे यांचं राज्यपालांना खोचक पत्र

| Updated on: Aug 18, 2023 | 1:15 PM

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्याने अमित ठाकरे यांनी हे पत्र लिहिलं आहे.

सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी पहाटेचा मुहूर्त निश्चित केला नाही... अमित ठाकरे यांचं राज्यपालांना खोचक पत्र
amit thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : मुंबई विद्यापीठाने रातोरात पत्रक काढून मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. निवडणुकांना स्थगिती देताना विद्यापीठाने कोणतंही सबळ कारण दिलं नाही. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांमधून संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी तर थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी पहाटेचा मुहूर्त निश्चित केला नाही, याबद्दल आपले आभारी आहोत, असा खोचक टोला अमित ठाकरे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. उद्या शनिवारी दुपारी अडीच वाजता मनसेच शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. मुंबई विद्यापीठाने अचानक सिनेट निवडणुका स्थगित केल्याने राज्यपालांची भेट घेणार आहे. सिनेटसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच निवडणुका स्थगित केल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या दबावामुळे निवडणुका स्थगित केल्याचा मनसेचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

अमित ठाकरे यांचं पत्र जसंच्या तसं

दि. १८ ऑगस्ट २०२३

मा. श्री. रमेश बैस
राज्यपाल, महाराष्ट्र राज्य.
कुलपती, मुंबई विद्यापीठ.

यांसी सविनय जय महाराष्ट्र!

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक ‘पुढील आदेश’ येईपर्यंत विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. ही निवडणूक लढवू इच्छिणारे नोंदणीकृत पदवीधर उमेदवार आज (शुक्रवार दि. १८ ऑगस्ट) सकाळी आपले उमेदवारी अर्ज विद्यापीठात दाखल करणार होते. मात्र केवळ १२ तास आधी, काल रात्री ११च्या सुमारास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांनी कालच्या शासन पत्राचा संदर्भ देऊन, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कालच्याच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर केलं. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली हे नमूद करण्याची पारदर्शकता दाखवणेही विद्यापीठाच्या कुलसचिवांना गरजेचे वाटले नाही.

आपल्याला माहितच आहे की, राजकीय- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुशिक्षितांसाठी सिनेट निवडणूक ही व्यवस्थेत प्रवेश करण्याची पहिली पायरी असते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह इतरही अनेक विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कारभाराबाबत तसंच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्यांबाबत काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, या पदाधिकाऱ्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या केवळ १२ तास अगोदर ही निवडणूक स्थगित करण्यात आल्यामुळे आता एक वेगळीच शंका उमेदवार तसंच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सुमारे ९५ हजार पदवीधरांच्या मनात उपस्थित झाली आहे- “विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे?”

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनशील प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि सिनेट निवडणूक नेमक्या कोणत्या कारणाने ‘रातोरात’ रद्द करण्यात आली हे स्पष्ट करावे, हीच आग्रहाची मागणी.

सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटे’चा मुहूर्त निश्चित केला नाही, यासाठी कुलपतींचे मन:पूर्वक आभार!

धन्यवाद.

आपला नम्र,
अमित ठाकरे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना