Bullet Train : सरकार बदललं, बुलेट ट्रेनचाही मार्ग सुसाट, ठाकरेंचा आक्षेप असणाऱ्या आणखी एका प्रकल्पाचा वेग वाढणार

| Updated on: Jul 03, 2022 | 7:14 PM

सरकार बदलल्याने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग आता सुसाट होणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. फडणवीसांनी सत्तेत येताच ठाकरेंचा आक्षेप असणाऱ्या आणखी एका प्रकल्पाला गती देण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. 

Bullet Train : सरकार बदललं, बुलेट ट्रेनचाही मार्ग सुसाट, ठाकरेंचा आक्षेप असणाऱ्या आणखी एका प्रकल्पाचा वेग वाढणार
बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनसाठी टेंडर प्रक्रिया सुरु
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : सरकार बदललं (Eknath Shinde) की अनेक विकास प्रकल्पांची दिशाही बदलते. हे गेल्या काही काळात आपल्याला दिसून आलं आहे. देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) महत्वकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रोच्या आरेतील कारशेडला ठाकरे सरकारने ब्रेक लावला. आता ठाकरे सरकार जाऊन पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आलं. तर पुन्हा त्या प्रकल्पाचीही दिशा बदलली आणि कारशेड हे आरेमध्येच करण्यासाठी हलचाली वाढल्या. हे अनेक प्रकल्पांच्या बाबतीत होताना दिसत आहे. या लाईनमध्ये आता बुलेट ट्रेनच्या (Mumbai Ahemdabad Bullet Train) प्रकल्पाचाही समावेश होणार आहे. सरकार बदलल्याने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग आता सुसाट होणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. फडणवीसांनी सत्तेत येताच ठाकरेंचा आक्षेप असणाऱ्या आणखी एका प्रकल्पाला गती देण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे.

बुलेट ट्रेनच्या कामाला गती येणार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेल हा प्रकल्प पंतप्रधान मोदींचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला नवं सरकार आता गती देत आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे रखडलेल्या बुलेट ट्रेनचा प्रकल्पाला गती मिळणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. बुलेट ट्रेनमधील खर्चाचा राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही भाजप-शिंदे गटाचं सरकार करणार असल्याची चर्चा आहे. या प्रकल्पाला ठाकरे सरकारकडून विरोध झाला होता.

कोणत्या बाबींवर आक्षेप होता?

या प्रकल्पाला ठाकरेंचा आणि इतर पक्षांचा काय आक्षेप होता हेही गणित समजून घेऊया. या प्रकल्पाला महाराष्ट्राची जमीन जास्त आहे. मात्र केवळ चारच स्टेशन महाराष्ट्रात असल्याचा आरोप करण्यात आला होता. यात मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्टेशन महाराष्ट्रात आहेत. तर इतर 8 स्थानकं गुजरातमध्ये प्रस्तावित आहेत. गुजरातमधील वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती ही स्थानकं या प्रकल्पात प्रस्तावित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच बुलेट ट्रेनचा जास्त फायदा होत आहे, असा आरोप अनेक पक्षांनी करत या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता.

राज ठाकरे यांचाही या प्रकल्पाला विरोध

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध करणाऱ्या पक्षात मनसेचाही समावेश आहे. राज ठाकरे यांनी या प्रकल्पावरून अनेकदा भाजपवर टीका केली आहे. आम्हाला एवढ्या जलद तिकडे जाऊन काय करायचं आहे? अहमदाबादला जाऊन काय ढोकळा खायचा का? असे अनेक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते. गेल्या काही दिवसात राज ठाकरेंची भाजपच्या बाबतीत बदलेली भूमिका पाहता आता राज ठाकरे या प्रकल्पाला विरोध करणार का? हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे.