मध्य रेल्वेचा खोळंबा, आसनगाव-सीएसएमटी लोकलमध्ये बिघाड, वाहतुकीवर परिणाम

| Updated on: Oct 06, 2022 | 2:15 PM

करीरोड, चिंचपोकळी, भायळ्यात गाड्या एकामागोमाग उभ्या, भायखळा स्टेशनजवळ लोकलमध्ये बिघाड, धीम्या वाहतुकीवर परिणाम

मध्य रेल्वेचा खोळंबा, आसनगाव-सीएसएमटी लोकलमध्ये बिघाड, वाहतुकीवर परिणाम
महत्त्वाची घडामोड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई : मध्य रेल्वेची (Central Railway Update) वाहतूक खोळंबली आहे. भायखळा स्टेशनजवळ (Byculla Railway Station) लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक (Mumbai Local News) कोलमडलं आहे. धीम्या वाहतुकीवर यामुळे मोठा परिणाम झालाय. करी रोड, चिंचपोकळी, भायखळ्यात गाड्या एकमागोमाग उभ्या असल्याचं पाहायला मिळालंय.

मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यानं प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. सॅन्डहर्स्ट रोड स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरची वाहतूक आता फास्ट ट्रॅकवरुन वळवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

घाई असलेल्या प्रवाशांनी थेट रेल्वे रुळांवरुनच जायला सुरुवात केली आहे. रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे स्थानकातून रेल्वे रुळांवर उतरले. रेल्वे रुळ पार करत लोकल प्रवाशांनी जाणं पसंत केलंय.

हे सुद्धा वाचा

Video : पाहा लाईव्ह घडामोडी

सध्या मध्य रेल्वेकडून सॅन्डहर्स्ट रोड स्थानकातील ओव्हरहेड वायरचा झालेला बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरु आहे. हा बिघाड दुरुस्त झाल्यानं विस्कळीत झालेली लोकल वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं आव्हान रेल्वे प्रशासनासमोर असणार आहे.

दरम्यान, आठवड्याभरापूर्वीच मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातही अशाच प्रकारे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली होती. ही लोकल सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी तब्बल 5 तासांचा वेळ लागला होता. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवेच बिघाड झाल्यामुळे ठाणे ते कल्याण मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.

30 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वे मार्गावर झालेल्या खोळंब्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. रेल्वे प्रशासनाकडून ही वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दुपारच्या फारशी गर्दी लोकलला नसते. मात्र गर्दीच्या वेळेआधी ही लोकलसेवा पूर्वपदावर आणण, हे रेल्वे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान असणार आहे.