पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ 10 हजार कोटींची मदत : मुख्यमंत्री

| Updated on: Nov 02, 2019 | 3:56 PM

हवालदील झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारकडून तब्बल 10 हजार कोटी रुपयांचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ 10 हजार कोटींची मदत : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने हाहा:कार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे (crop damages due to nonseasonal rains). हवालदील झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारकडून तब्बल 10 हजार कोटी रुपयांचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं (CM Devendra Fadnavis).

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज उप समितीची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. यावेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार 10 हजार कोटींची मदत करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं (10000 crore help to Farmers).

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे केले जातील. तसेच, जर प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत आणि पंचनामे शक्य झाले नाही, तर शेतकाऱ्यांनी नुकसानीचा फोटो पाठवला तरी तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सरकार तातडीने 10 हजार कोटी रुपयांची मदत करणार आहे. नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं असल्याने राज्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त काय दिलासा देता येईल, याचा प्रयत्नात आम्ही आहोत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, येत्या तीन ते चार दिवसात अंतिम माहिती येईल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे जमा करायचे, कुठल्या पिकासाठी कशी मदत करायची, याबाबतचे निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

त्याशिवाय, विमा कंपन्यांशी संपर्क साधून त्यांनीही मदत करावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. जवळपास 50 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, त्याचे वेगळे पैसे त्यांना मिळतील. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मंत्री, अधिकारी पाहणीदौऱ्यावर आहेत. तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं.

केंद्र सरकारनेही मदत करावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या नियमात जे बसेल तेवढी मदत केंद्र सरकार करेल. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून जी काही मदत करु शकेल, त्यासाठीचे आदेश देण्यात आले आहेत.

यावर्षी अतिशय प्रचंड पाऊस झाला

एका सुपरसायक्लॉनसह 4 वादळं अरबी समुद्रात तयार झाली. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात अधिक होती. पुरावा म्हणून स्थानिक गावकर्‍यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्र सुद्धा ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.प्रशासनाने ही स्थिती संपूर्ण संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकर्‍याची समस्या ऐकून घेतली जाईल, यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअ‍ॅप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.