उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगा’, देवेंद्र फडणवीस म्हणतात……

| Updated on: Nov 26, 2022 | 8:04 PM

उद्धव ठाकरेंनी टीका करताना फडणवीसांना 'जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा', असा घणाघात केलाय. त्यांच्या या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही उत्तर देण्यात आलंय.

उद्धव ठाकरे म्हणाले, जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, देवेंद्र फडणवीस म्हणतात......
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी संवाद मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी वीजबिल आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंनी टीका करताना फडणवीसांना ‘जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा’, असा घणाघात केलाय. त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी त्याच शब्दांचा पुनरुच्चार करत उद्धव ठाकरेंचे दोन व्हिडीओ फेसबुकवर शेअर केले. यावेळी त्यांनी ठाकरेंवर टीकाही केली.

“काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही. 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रती पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय. जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

हे सुद्धा वाचा

“महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे”, असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारचं वीज वसुलीबाबतच्या आदेशाचं परिपत्रकही आपल्या पोस्टला जोडलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल दोन व्हिडीओ शेअर केलेत. यातील पहिला व्हिडीओ हा 2019 चा ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काय भूमिका मांडली होती ते त्यांनी दाखवलंय. तर दुसऱ्या व्हिडीओत ठाकरेंच्या यावर्षीच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलची भूमिका दाखवली आहे.

पहिल्या व्हिडीओत उद्धव ठाकरे हे 2019 मध्ये मुख्यमंत्री असताना शेतकरी कर्जमाफी बद्दल भूमिका मांडलीय. शेतकऱ्यांनी 25 ते 50 हजार हेक्टरी मदतीची मागणी मी मान्य केलेलीच आहे, असं उद्धव ठाकरे पहिल्या व्हिडीओत म्हणतात. तर दुसऱ्या व्हिडीओत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना तात्काळ मदतीबाबत मागणी करताना दिसतात.

“माझ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळालीच पाहिजे. ते म्हणतात हेक्टरी 50 हजार रुपये. ही मागणी त्यांची आहे. त्यांच्या मागणीला शिवसेनेला पूर्ण पाठिंबा आहे”, असं उद्धव ठाकरे दुसऱ्या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.