मुंबईच्या पहिल्याच पावसात रेल्वेचा बिघाड, विमानसेवाही ठप्प

| Updated on: Jun 10, 2019 | 11:11 PM

मुंबईतील मालाड-कांदीवली, गोरेगाव या उपनगरीय भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली. शिवाय मालाडच्या काही भागात पाणीही तुंबल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईच्या पहिल्याच पावसात रेल्वेचा बिघाड, विमानसेवाही ठप्प
लोकल ट्रेन
Follow us on

मुंबई : मुंबईतील मालाड-कांदीवली, गोरेगाव या उपनगरीय भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून तीव्र उकाड्याने त्रस्त नागरिकांनी पावसाच्या आगमनासह सुटकेचा श्वास सोडला. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली. शिवाय मालाडच्या काही भागात पाणीही तुंबल्याचे पाहायला मिळाले. मुंबई विमानतळही जोरदार पावसाने ठप्प झाले. अंधुक वातावरणामुळे मुंबई विमानतळावरील विमान सेवा अर्ध्या तासापासून ठप्प आहे. न्यूयॉर्क-मुंबई विमान दिल्लीला वळवण्यात आले असून अनेक विमाने मुंबईच्या आकाशात घिरट्या  घालत आहेत.

मालाड रेल्वे स्टेशन परिसरात पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांची चांगलीच धावपळ बघायला मिळाली. जेथे आसरा मिळेल तेथे आडोसा घेताना नागरिक दिसले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीतही पहिल्या पावसाच्या सरीचे आगमन झाले. आज रात्री साडेआठच्या सुमारास महामार्गावरील सकवार परिसरात या सरी बरसल्या. अवघ्या 10 मिनिटांसाठी आलेल्या या पावसाने परिसरातील नागरिकांना चांगलाच आनंद झाला. अंधेरी विलेपार्लेतही विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पाहायला मिळाला.

विरारमध्येही पावसाची हजेरी

सकाळपासूनच वसई-विरारमध्ये ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणात दमटपणा येऊन प्रचंड उकाडा सुरू होता. पाऊस पडणार अशी आशा वाटत असताना अचानक सकवार परिसरात पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. विरार परिसरातील अनेक भागात अर्धा तासाहून अधिक काळ वीज गायब झाली.

पावसाची वाट पाहणाऱ्या कल्याणकरांनाही आज दिलासा मिळाला. कल्याण पूर्वेत आज पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कल्याण पूर्वेतील काही भागात बत्ती गुल झाल्याचेही पाहायला मिळाले. ठाण्यातही पाऊस सुरु आहे. मुरबाड तालुक्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. टोकावडे, शिवळे, सरळगाव, धसईसह अनेक ठिकाणी पाऊस झाला. वादळाने काही भागात नुकसानही झाले. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा आला. उकाड्याने त्रस्त नागरिक या गारव्याने चांगलेच सुखावले. लहानग्यांसोबत मोठ्यांनी देखील पावसाचा नाचून आनंद घेतला. मात्र, काही भागात पावसामुळे वीज खंडित झाली.

पावसाने अनेक ठिकाणी वीज खंडीत

सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर पाऊस बरसला. रत्नागिरी शहरातही सायंकाळी पाऊस पडला. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज खंडीत झाली. रायगड जिल्ह्यातीलही खोपोली-खालापूर, सुधागड, पेण, परिसरात जोरदार पाऊस आला. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले.

पालघरमध्येही पावसाच्या सरी बरसल्या. बच्चे कंपनीने या पावसात भिजून नाचून आनंद व्यक्त केला. पावसामुळे पालघर शहराची आणि बोईसर शहराची  वीज खंडित झाली. पालघर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागात रिमझिम सरी अनुभवायला मिळाल्या.

पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

पिंपरी चिंचवडच्या काही भागातही सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. येथे संध्याकाळी 8 च्या सुमाराला पावसाला सुरुवात झाली. शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला. सलग 2 दिवस पडलेल्या पावसामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह राजापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी वीज आणि टेलिफोन सेवा खंडित झाली. या पावसामुळे बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे. 

बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे पाटोदा, शिरूरमध्ये मोठे नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडाले, विद्युत पोलही उन्मळून पडले. बीडमधील सर्पराज्ञी प्रकल्पही पावसाने उध्वस्त झाला. प्रकल्पातील वन्यजीव सुरक्षित आहेत.