विक्रोळीमध्ये ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात धान्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने शुक्रवारी भीषण अपघात घडला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या जखमींवर घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विक्रोळीमधील सूर्यानगर पोलीस ठाण्याजवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. काही […]

विक्रोळीमध्ये ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
Follow us on

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात धान्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने शुक्रवारी भीषण अपघात घडला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या जखमींवर घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विक्रोळीमधील सूर्यानगर पोलीस ठाण्याजवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पालिकेतर्फे गटाराचे काम करण्यात आले होते. या गटाराचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास  धान्याने भरलेला ट्रक अचानक त्या ठिकाणी फसला. त्यानंतर ट्रक चालकाने ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने धान्याने भरलेला ट्रक पलटी झाला.

ट्रक पलटी झाल्याने बाजूला असलेल्या चार नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. अश्विन हेवारे (32), विशाल शेलार (22), अब्दुल हमीद शेख (42), चंद्रशेखर मुसळे (40) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर या अपघातात चांद हसन शेख हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याला घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेची अपघाती नोंद केली असून सध्या या घटनेची पोलिस चौकशी सुरू आहे.

पाहा व्हिडीओ :