राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा; नागरिकांनी दोन्ही डोसेस घेण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन

| Updated on: Nov 02, 2021 | 9:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 3 नोव्हेंबर रोजी कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूर्वतयारी बैठक झाली.

राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा; नागरिकांनी दोन्ही डोसेस घेण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन
राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा
Follow us on

मुंबई : विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोनाची लाट अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. (Get 100 percent vaccinated in the state by November 30, chief minister appeal)

आपआपल्या जिल्ह्यात 100 % लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सुचनाही केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 3 नोव्हेंबर रोजी कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना येथून सहभागी झाले. वर्षा निवासस्थानावरील समिती कक्षात मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त सचींद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.

नागरिकांनी बेफिकीर होऊ नये

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, सुरवातीला कोविडची भीती होती. पण आता कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी चाचणीचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोरोना गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लसीकरणाच्या सांख्यिकीचे जिल्हाधिकारी यांनी विश्लेषण करावे आणि त्याअनुषंगाने लसीकरण बाबत धोरण ठरवावे. दीपावली नंतर विशेष उपाययोजना आखून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांनी ही सूचना मांडल्या. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. (Get 100 percent vaccinated in the state by November 30, chief minister appeal)

इतर बातम्या

अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार; काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्यांची नार्को टेस्ट करा, आशिष शेलार यांची मागणी