सोलापूर, मुंबईसह 21 शहरातील भूजल पातळी संपण्याच्या मार्गावर

| Updated on: Jun 23, 2019 | 3:22 PM

देशात लांबलेला मान्सून आणि पाण्याचे आटते साठे यातून मोठे संकट तयार झाले आहे. सोलापूर, मुंबईसह देशातील 21 शहरांमधील भूजल पातळी संपण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे.

सोलापूर, मुंबईसह 21 शहरातील भूजल पातळी संपण्याच्या मार्गावर
Follow us on

मुंबई : देशात लांबलेला मान्सून आणि पाण्याचे आटते साठे यातून मोठे संकट तयार झाले आहे. सोलापूर, मुंबईसह देशातील 21 शहरांमधील भूजल पातळी संपण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत झपाट्याने नष्ट होत असल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर उद्भवत आहे. यात भर म्हणजे वाढते प्रदुषण, जल स्त्रोतांचं प्रदुषण, पाण्याची वाढती मागणी आणि होणारा अपव्यय यासह नैसर्गिक स्त्रोतांचे असमान वाटप यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतील, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. पाण्याचा उपसा अधिक आणि जलसंधारण कमी अशा स्थितीत जलस्तर प्रत्येक वर्षी 0.5-2 मीटर खाली जात आहे.

जलस्त्रोत संपण्याच्या मार्गावर असलेल्या शहरांमध्ये सोलापूर, मुंबईसह मेरठ, दिल्ली, फरीदाबाद, गुरुग्राम, कानपूर, जयपूर, अमरावती, शिमला, धनबाद, जमशेदपूर, आसनसोल, विशाखापट्टनम, विजयवाडा, चेन्नई, मदुरै, कोच्ची, बंगळुरु, कोयंबतूर आणि हैदराबाद या शहरांचा क्रमांक लागलतो. या सर्व ठिकाणीचे जलस्त्रोत जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे.

भूजल उपशामुळे पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. दिल्लीत तर उपलब्ध भुगर्भातील पाण्यातील 76 टक्के पाणी वापराच्या लायकही नाही. या पाण्यात शेवाळ आणि अनेक प्रकारच्या रसायनांचे प्रमाण मोठे आहे. या पाण्यामुळे मोठ्या आजारांचाही धोका आहे. केंद्रीय भूजल मंडळाने केंद्र सरकारलाही माहिती दिली आहे.

मॅगसेस पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा इशारा

घटत्या भूजल साठ्यांच्या मुद्द्यावर मॅगसेस पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनीही इशारा दिला आहे. ते म्हणाले, “देशातील 21 शहरांचा भूजलसाठा पूर्णपणे संपण्याच्या स्थितीत आहे. जर आताही आपण सावध झालो नाही, तर आपल्याला पेट्रोल-डिझेलप्रमाणे पाणीही पंपावक विकत घ्यावे लागेल.” यावेळी त्यांनी आपम पाण्याचा उपसा नाही तर शोषण करत असल्याचेही मत नोंदवले.