विनायक डावरुंग टीव्ही9 मराठी प्रतिनिधी मुंबई : दिवाळी सण (Diwali Festival) तोंडावर येताच मागणी होते ती बोनसची. मुंबई महापालिकेतील (BMC) कर्मचाऱ्यांचा बोनस हा तर दरवर्षी चर्चेचाच विषय असतो. गतवर्षी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. आता यामध्ये वाढ करुन बोनस द्यावा अशी मागणी होत आहे. बोनसत्या अनुषंगाने महापालिका प्रशासक इकबाल चहल यांनी कृती समितीची बैठक बोलावली होती. यावेळी कर्मचाऱ्यांनी ही मागणी केली होती. आता दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये बोनस नेमका किती यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
दरवर्षी दिवळीच्या सणानिमित्त मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून अधिकची रक्कम अदा केली जाते. त्यामुळे यंदाही हा बोनस वाढीव स्वरुपात मिळावा अशी मागणी कृती समितीकडे करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
महापालिका प्रशासक चहल यांनी बोनसबाबत बैठक बोलावली होती. त्यानुसार कृती समितीचा आणि कर्मचाऱ्यांचा मागणी पाहता आता प्रशासक इकबाल चहल यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यामध्येच काय ते ठरणार आहे.
गतवर्षी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असताना त्यांनी 20 हजार रुपये असे बोनसचे स्वरुप ठरवले होते. मात्र, आता कर्मचारी हे 25 हजाराची मागणी करीत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे 25 हजार रुपये देऊ करणार की त्यापेक्षा कमी हे पहावे लागणार आहे.
आगामी काळात महापालिका निवडणुका होत आहेत. निवडणुकांपुर्वीची कर्मचाऱ्यांची दिवळी अधिक गोड करण्यासाठी मुख्यमंत्री कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करणार की नाही, हे पहावे लागणार आहे. बोनससंदर्भातला निर्णय हा दोन दिवसांमध्ये होणार आहे.