Mumbai Rain | मुंबईतील दरडी जीवघेण्या, 29 वर्षात 290 लोकांनी प्राण गमावले

| Updated on: Jul 18, 2021 | 9:34 PM

विशेष म्हणजे गेल्या 29 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली आहे.

Mumbai Rain | मुंबईतील दरडी जीवघेण्या, 29 वर्षात 290 लोकांनी प्राण गमावले
Mumbai Landslide (फोटो प्रातनिधिक)
Follow us on

मुंबई : रात्रभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. यात आतापर्यंत 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 29 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली आहे.

दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांबाबत राज्य सरकार गंभीर नाही

अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या 10 वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. मुंबईत जवळपास 22,483 कुटुंब धोकादायक ठिकाणी राहत आहेत. मुंबईतील दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्तहानी नवीन नसून गेल्या 10 वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर दिसत नाही, असे स्पष्ट होत आहे. कारण गेल्या 29 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत जवळपास 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 300 हून अधिक नागरिक जखमी झाले.

डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत करा

मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात 257 ठिकाण डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत आहे. या भागातील 22,483 झोपड्यांपैकी 9657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळयात भूस्खलनामुळे 327 ठिकाणाबाबत अनिल गलगली यांनी महाराष्ट्र सरकारला आधीच सतर्क केले होते.

…तर नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते

वर्ष 1992 ते 2021 या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 290 लोकांनी जीव गमावला आहे. तर 300 हून अधिक जखमी झाले आहेत. 2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्‍या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती. त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते.

कोणताही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन नाही 

सुधार मंडळाच्या अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर दहा वर्षे उलटून गेली आहेत. पण नगरविकास विभाग अद्याप त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणतीही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलीच नाही, असे गलगली यांनी सांगितले.

(Mumbai Landslides accident last 29 years 290 people died reveled from RTI Data)

संबंधित बातम्या : 

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 17 जणांचा मृत्यू

Mumbai Rains: मुंबई, पालघर,डहाणूसाठी पुढील 24 तास महत्वाचे, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain | कुठे भिंत कोसळली, तर कुठे दरड कोसळली, मुंबईत तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू