एसटी संपकाळात आत्महत्या केलेल्या केवळ ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच नोकरी

| Updated on: Jan 11, 2023 | 2:09 PM

एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या सहीनिशी जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकामुळे एसटीच्या संपकाळात गैरहजर राहीला म्हणून कारवाई झालेल्या आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच एसटीमध्ये नोकरी मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एसटी संपकाळात आत्महत्या केलेल्या केवळ या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच नोकरी
MSRTC
Follow us on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा म्हणून संप केला होता. संपकाळापूर्वी आणि नंतर हालाखीच्या परिस्थिती अनेक कर्मचाऱ्यांनी आपले आयुष्य संपविले. या दुर्दैवी कर्मचाऱ्यांच्या वारसांना खास बाब म्हणून अनुकंपा तत्वाखाली एसटी महामंडळात सामावून घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनी करण करण्याच्या मागणीसाठी 28 ऑक्टोबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. हा संप सुरू होण्यापूर्वी आर्थिक हलाखीने अनेक कर्मचाऱ्यांनी आपले आयुष्य आत्महत्या करून संपविले होते. त्यामुळे अशा आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. परंतू हा निर्णय लागू करताना महामंडळाने काही निकषाचे बंधन टाकले आहे.

संपकाळात गैरहजर राहील्याबद्दल ज्या कर्मचाऱ्यावर शिस्त व आवेदनपद्धतीने निलंबनाची किंवा बडतर्फीची कारवाई झाली आहे, आणि त्याने या निलंबन किंवा बडतर्फीच्या कारवाई विरोधात आवेदन सादर केले आहे, अशा कर्मचाऱ्यांनी आवेदन प्राधिकाऱ्याकडे प्रथम आवेदन सादर करण्यापूर्वी किंवा अथवा त्याच्या आवेदनावर निर्णय होण्यापूर्वी त्याचे निधन झाले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नोकरी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याचे परीपत्रक जारी झाले आहे.

दि. 28.10.2021 ते दि. 22.04.2022 या संपकाळामध्ये गैरहजरीच्या कारणास्तव बडतर्फ केलेल्या व नंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना ते सेवेत होते असे गृहीत धरून त्यांच्या अवलंबितांना एकवेळची बाब म्हणून अनुकंपा तत्वावरील नोकरी देण्यात येणार असून हे प्रकरण पूर्वोदाहरण म्हणून भविष्यात आधारभूत म्हणून वापरले जाणार नसल्याचेही महामंडळाने स्पष्ठ केले आहे.