नाशिक : मनसेच्या (MNS) वतीने मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी तीन मेचा अल्टिमेटम (Ultimatum) देण्यात आला होता. तीन मेपर्यंत अनधिकृत भोंगे हटवण्यात यावेत, अन्यथा आम्ही देखील हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता. आता तीन मेचा अल्टिमेटम उलटून गेल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मनसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. आज राज्यभरात मनसैनिकांच्या वतीने हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच जय हनुमान, जय श्रीरामाच्या घोषणा देखील देण्यात येत आहेत. नाशिकमध्ये वातावरण चांगलेच तापले असून, या सर्व पार्श्वभूमीवर आतापर्यंत नाशिकमधील चौदा मनसैनिकांविरोधात पोलिसांनी तडीपाडीची नोटीस बजावली आहे. तर शंभरहुन अधिक कार्यकर्त्यांवर प्रतिप्रधांत्मक कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
भोंग्याचे प्रकरण चांगलेच चिरघळले आहे. अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. नाशिकच्या जबरेश्वर मंदिरात हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या जबरेश्वर मंदिरात हनुमान चालीसा लावत असताना या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून माईक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. नाशिक शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान मंगळवारी रात्रीपासूनच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मंगळवारी रात्री मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर जय हनुमानची घोषणा दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नाशिकमध्ये आज ठिकठिकणी मनसैनिकांकडून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत. आज राज्यभरात सगळीकडे असेच चित्र पहायला मिळत आहे.