नळदूर्ग किल्ला : उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूची वैशिष्ट्ये आणि महत्व

| Updated on: Nov 03, 2021 | 9:02 AM

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक तुळजापूरला येतात. त्याचवेळी अनेक भाविक आणि अन्य पर्यटक तुळजापूरपासून साधारण 33 किलोमीटर अंतरावर असलेल्या नळदूर्ग किल्ल्याला भेट देतात. अशा नळदूर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व आणि वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत.

नळदूर्ग किल्ला : उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूची वैशिष्ट्ये आणि महत्व
नळदूर्ग किल्ला
Follow us on

उस्मानाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख ही दुष्काळी जिल्हा अशीच राहिली आहे. मात्र, तुळजाभवानी मंदिर आणि नळदूर्ग किल्ल्यामुळे जिल्ह्याची ओळख सर्वदूर आहे. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक तुळजापूरला येतात. त्याचवेळी अनेक भाविक आणि अन्य पर्यटक तुळजापूरपासून साधारण 33 किलोमीटर अंतरावर असलेल्या नळदूर्ग किल्ल्याला भेट देतात. अशा नळदूर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व आणि वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. (Historical significance and features of Naldurg fort in Osmanabad district)

महाराष्ट्रात अनेक भुईकोट किल्ले, जलदूर्ग आणि गिरीदूर्ग आहेत. त्यातील नळदूर्ग किल्ल्याचा समावेश हा भुईकोट किल्ल्यात होतो. राज्यातील भुईकोट किल्ल्यांमध्ये नळदूर्गचा किल्ला हा सर्वात मोठा आहे. नळदूर्ग किल्ल्याचा संबंध पुराणकाळातील नल-दमयंतीशी जोडला जातो. नळ राजाने हा किल्ला बांधला. त्यामुळे त्याच्या नावावरुन या किल्ल्याचं नाव नळदूर्ग असं ठेवण्यात आलं. हा किल्ला काही काळ चालुक्य राजाकडे होता. त्यानंतर तो बहामनी सुलतानांच्या ताब्यात आला. बहामनी राज्यांच्या विघटनानंतर हा किल्ला आदिलशाहाकडे आला. त्यानंतर मुघल आणि निजामांकडेही हा किल्ला होता. इ. स. 1758 मध्ये हा किल्ला नानासाहेब पेशवे यांनीही जिंकला होता. इ.स. 1799 मध्ये निजामाने इंग्रजांबरोबर तह केला. त्यानुसार फ्रेंच सैनिकांऐवजी इंग्रजांचे सैनिक ठेवण्याचे ठरले. या तहाने इंग्रजांचे वर्चस्व हैद्राबादेत प्रस्थापित झाले आणि निजामाचे स्वातंत्र्य संपले.

नर-मादी धबधबा

नळदूर्ग किल्ल्यावरील नर-मादी धबधबा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. मुख्य किल्ला आणि रणमंडख हे किल्ल्याचे दोन भाग पाणी महलने जोडलेले आहेत. इब्राहिम आदिलशहा दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून त्यात पाणी महालाची योजना केलेली आहे. हे धरण व महाल बेसाल्ट दगडात बांधलेले आहे. पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यावर पाणी महालावरुन पडते. हे पाणी दोन ठिकाणांहून खाली पडते. हे दोन धबधबे नर व मादी या नावाने ओळखले जातात. यामुळे किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्यात खूपच भर पडली आहे.

नर मादी धबधबा

3 किलोमीटरच्या तटबंदीत एकूण 114 बुरुज

नळदूर्ग किल्ल्याची जवळ जवळ 3 किलोमीटर लांबीची तटबंदी अतिशय मजबूत असून ती काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेली आहे. या तटबंदीत एकूण 114 बुरुज आहेत. या तटबंदीत परांडा बुरुज, उपळा बुरुज, बंदा नवाज बुरुज, नव बुरुज इत्यादी नावे आहेत. किल्ल्याचे प्रवेशद्वार,रणमंडळ ,हत्तीखाना, किल्लेदाराचा वाडा,जामा मशीद,नऊ पाकळ्यांचा बुरुज किंवा नवबुरुज, बारदरी, रंग महाल, पाणी महाल, उपळ्या बुरुज अशी नळदुर्ग किल्ल्यावरील प्रमुख पहाण्यासारखी ठिकाणे आहे.

नळदूर्ग किल्ला

पर्यटकांसाठी विविध खेळांच्या सुविधा

नळदुर्ग किल्ल्याला भेट देणार्या पर्यटकांसाठी याठिकाणी बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, वॉल क्लायम्बिंग इ. खेळांची सुविधा देण्यात येतील. किल्ल्याच्या आतील एका भागात सँड बाईक राईडची सोयही पर्यटकांना उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. नळदुर्ग किल्ला हा जवळ जवळ 125 एकर परिसरात पसरलेला असल्यामुळे किल्ला पाहण्यासाठी इलेक्ट्रिक बग्गी राईड ही पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.

इतर बातम्या :

Deglur Assembly by Election Result : भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय, सर्वत्र जल्लोष

Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?

Historical significance and features of Naldurg fort in Osmanabad district