Nashik Trees | आदित्य म्हणतात वटवृक्ष वाचला, पण 5 तास ताटकळलेल्या पर्यावरणप्रेमींना भेटही नाही, इतर 588 झाडांचे काय?

| Updated on: Jan 29, 2022 | 9:49 AM

आदित्य ठाकरे म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वीची सर्व झाडे वाचली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार करूनच शाश्वत विकास कामांवर भर देण्यात येईल.

Nashik Trees | आदित्य म्हणतात वटवृक्ष वाचला, पण 5 तास ताटकळलेल्या पर्यावरणप्रेमींना भेटही नाही, इतर 588 झाडांचे काय?
नाशिक दौऱ्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाच तास ताटकळलेल्या पर्यावरण प्रेमींना भेटीसाठी साधा पाच मिनिटांचाही वेळ दिला नाही.
Follow us on

नाशिकः नाशिककरांनो (Nashik)काळजी करू नका झाड वाचले आहे, अशी भावनिक साद घालत जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौक येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या (flyover) आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाशिक दौऱ्यात दिली. मात्र, त्यांनी चक्क 5 तास ताटकळलेल्या पर्यावरणप्रेमींना म्हणणे मांडण्यासाठी फक्त पाच मिनिटही दिले नाहीत. त्यामुळे याच उड्डाणपुलासाठी महापालिकेने 588 झाडांना नोटीस बजावली आहे. त्यांचे काय होणार, असा सवाल आता निर्माण झाला आहे. खरे तर नाशिकमधील उंटवाडी येथील उड्डाणपुलासाठी 200 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचावा म्हणून उड्डाणपुलाचे डिझाईन बदलण्याच्या सूचना आदित्य यांनी पूर्वीच ट्विट करून केल्या आहेत. या ट्विटमध्ये आदित्य म्हणतात की, मी नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलाश जाधव यांच्याशी बोललो आणि त्यांना प्रस्तावित उड्डाणपुलाच्या डिझाईनची पुनर्रचना करण्याची विनंती केली. या उड्डाणपुलासाठी एक 200 वर्षे जुने झाड आणि इतर साडेचारशेपेक्षा झाडे तोडावी लागतील. 200 वर्ष जुने वटवृक्ष आणि त्यामधील मंदिराचे जतन करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, उर्वरित झाडांचे काय हे विचारण्यासाठी आलेल्या पर्यावरणप्रेमींना त्यांनी भेट न दिल्याने तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे.

वटवृक्षाची केली पाहणी

नाशिकमधील तिडकेनगर येथील उंटवाडी म्हसोबा महाराज देवस्थानभोवती दोनशे वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाची पाहणीही आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त दीपक पांडे्य, कालिका मंदिराचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, म्हसोबा मंदिर समितीचे ट्रस्टी प्रवीण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, तिडकेनगर येथील उंटवाडी म्हसोबा महाराज देवस्थानाभोवती असलेला वटवृक्ष हा अंदाजे दोनशे वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. अशा प्राचीन वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने हा महावृक्ष वाचवून उड्डाण पुलाची रचना केली जाईल.

नदी स्वच्छता मोहीम

आदित्य पुढे म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वीची सर्व झाडे वाचली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार करूनच शाश्वत विकास कामांवर भर देण्यात येईल. नाशिक शहरातील इतरही झाडे वाचविण्यासाठी महानगरपालिकेच्या नवीन आराखड्यात नियोजन करण्यात येईल. नंदिनी नदीची संपूर्ण पाहणी करत असताना पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, औरंगाबादच्या धर्तीवर लोकसहभागातून नंदिनी नदीची स्वच्छता झाल्याची करण्यात येईल.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?