नाशिक : कोरोना संसर्गाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्यानं नागरिक लसीकरण केंद्रावर जात आहेत. मात्र, कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे प्रचंड गर्दी होऊन अनेकांना विनालस घरी परतावं लागतंय. इगतपुरी येथील रेल्वे हॉस्पिटलला रोज 300 ते 400 डोस लागत असताना केवळ 150 डोस मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांना रांगेत उभं राहूनही शेवटी लसीकरण केंद्रातून रिकाम्या हातीच परत जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय.
विशेष म्हणजे काही नागरिकांनी पहिला डोस घेऊनही त्यांना दुसरा डोस मिळणे कठीण झाले आहे. दुसरा डोस घेणाऱ्या 45 व 60 वर्षांवरील नागरिकांना तर शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. लस घेतल्यानं कोरोना झाल्यानंतर प्रकृतीत समस्या निर्माण होत नाही, असे बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत अनुभवाला आले. त्यामुळे लस घेण्यासाठी केंद्रासमोर आता युवक-युवतीही गर्दी करत आहेत. कूपन घेण्यासाठीही पहाटेपासून रांगा लागत आहेत.
आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी 10 वाजता लसीकरणाला सुरुवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी रेल्वे हॉस्पिटलने कूपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढे डोस आले तेवढेच कूपन आधी वितरित केले जातात. नागरिक पहिल्यांदा कूपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जाते. त्यामुळे 150 लस उपलब्ध असताना 250 ते 300 नागरिक केवळ कूपनसाठी रांगेत लागतात. उरलेल्या नागरिकांना आल्या पावली मागे फिरावे लागते. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणाचे डोस वाढवून देण्याची मागणी केली आहे.
Corona vaccine shortage in Igatpuri Nashik senior citizens also face issue