पाण्यासाठी जीव टांगला; 50 फूट खोल विहिरीत उतरून भरावी लागते घागर, नाशिकमधला धडकी भरवणारा व्हिडिओ!

| Updated on: Apr 04, 2022 | 1:36 PM

येवला तालुक्यातील देवना साठवण तलावासह 21 योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व योजनांसाठी शासनाकडून 28 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह 41 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या योजना कधी पूर्ण होणार, हा प्रश्न आहे.

पाण्यासाठी जीव टांगला; 50 फूट खोल विहिरीत उतरून भरावी लागते घागर, नाशिकमधला धडकी भरवणारा व्हिडिओ!
नाशिक जिल्ह्यात पन्नास फूट खोल विहिरीत उतरून महिलांना पाणी भरावे लागत आहे.
Follow us on

नाशिकः गोदावरीला तब्बल पाच महापूर आलेल्या नाशिक (Nashik) जिह्यात यंदा भयाण पाणीटंचाई अनुभवायला मिळतेय. मेटघर गावातल्या महिलांंना चक्क पन्नास फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागतेय. मात्र, कधीही बांधावर न गेलेल्या प्रशासनाला या तीव्रतेची जाणीव नाही. हे पाहून कुठे नेऊ ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत. मालेगाव (Malegaon), मनमाडसह इतर तालुक्यालाही यंदा मुसळधार पावसाने झोडपले. अजूनपर्यंत अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू होता, पण अनेकांच्या नशिबी असलेली पाण्याची फरफट अजून काही केल्या थांबली नाही. महिलांना पन्नास फूट खोल विहिरीतून उतरून, जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे सटाणा तालुक्यातील रातीर येथे संतापलेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकत ग्रामसेवक व सदस्यांना कोंडले आहे. तालुक्यातील रातीर, सुराणे, रामतीर आदी खेड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरतेय, पण ढीम्म प्रशासनाला याचे सोयरसुतक नाही.

महिलांचा जीव धोक्यात

नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण, सटाणा भागात सध्या पाण्यासाठी महिलांना तीव्र संघर्ष करावा लागतोय. रातीर, सुराणे, रामतीरमध्ये सकाळी उठल्यापासून महिलांना फक्त पाण्याची चिंता असते. चार किलोमीटर, तर कुठे पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. पाणी जवळ असले तरीही विहीर खोल असते. नाशिक जिल्ह्यातल्या मेटघर गावात तर महिलांना पन्नास फूट खोल अशा दगडाने बांधलेल्या विहिरीत उतरून पाणी भरावे लागते. विहिरीत उतरताना थोडीशी चूक घडली अथवा पाय निसटला, तर जीव धोक्यात गेलाच म्हणून समजा. हे पाहता प्रशासनाने तात्काळ टँकर सुरू करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केलीय.

पाणवठे पडले कोरडेठाक

दररोज उन्हाची तीव्रता वाढत असून वन्य प्राण्यांना रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येवला तालुक्यातील उत्तर- पूर्व भागात वनक्षेत्र असून, मोठ्या प्रमाणात हरणांची संख्या आहे. या वन्यप्राण्यांची तहान भागावी म्हणून पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र, ममदापूर वनक्षेत्रात पाणवठ्यामध्ये सध्या पाणी नाही. त्यामुळे उन्हाच्या तडाक्यामध्ये अक्षरशः हरणांसह इतर वन्यप्राण्यांना पाण्याकरिता वणवण करण्याची वेळ येत आहे. पाणवठे कोरडेठाक असल्याने त्यात पाणी टाकावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

योजनांची पूर्तता कधी?

नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील देवनासह 21 योजनांना प्रशासकीय मान्यता मिळूनही कोरोनाच्या निर्बंधांमुळे 23 मे 2021 रोजी महामंडळाकडून राज्यातील सर्व योजनांच्या निविदा प्रक्रियेस स्थगिती देण्यात आलेली होती. अखेर ही स्थगिती महामंडळाने उठविली असून, येवला तालुक्यातील देवना साठवण तलावासह 21 योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व योजनांसाठी शासनाकडून 28 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह 41 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या योजना कधी पूर्ण होणार, हा प्रश्न आहे.

नाशिकचे तापमान (कमाल आणि किमान)

– 27 मार्च – 24 आणि 34 अंश सेल्सियस
– 28 मार्च – 24 आणि 33 अंश सेल्सियस
– 29 मार्च – 23 आणि 36 अंश सेल्सियस
– 30 मार्च – 23 आणि 34 अंश सेल्सियस
– 31 मार्च – 20 आणि 33 अंश सेल्सियस
– 1 एप्रिल – 20 आणि 33 अंश सेल्सियस
– 2 – 24 आणि 32 अंश सेल्सियस
– 3 – 21 आणि 39 अंश सेल्सियस
– 4 – 21 आणि 39 अंश सेल्सियस

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?