गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थी ते अमेरिकेतील वरिष्ठ वैज्ञानिक, डॉ. भास्कर हलामी यांची यशोगाथा

| Updated on: Nov 24, 2022 | 5:00 PM

चिरचाडी या छोट्याशा गावी एका गरीब आदिवासी कुटुंबात भास्कर हलामी यांचा जन्म झाला. आज अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थी ते अमेरिकेतील वरिष्ठ वैज्ञानिक, डॉ. भास्कर हलामी यांची यशोगाथा
डॉ. भास्कर हलामी
Follow us on

गडचिरोली – आदिवासी समाजातील डॉ. भास्कर हलामी या गडचिरोलीच्या सुपुत्राचा वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून यशस्वी प्रवास सध्या चर्चेत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चिरचाडी गावातून थेट अमेरिकेत पोचलेल्या संशोधक पुत्राचे गावाला कौतुक आहे. भास्कर यांच्या घरी हलाखीची परिस्थिती होती. दोनवेळच्या अन्नासाठी मोठा संघर्ष वाट्याला आला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उच्च शिक्षण घेत थेट अमेरिकेत वैज्ञानिकपदी निवड झाली. गडचिरोली जिल्ह्यातील चिरचाडीतील डॉ. भास्कर हलामी यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी या छोट्याशा गावी एका गरीब आदिवासी कुटुंबात भास्कर हलामी यांचा जन्म झाला. आज अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणेसुद्धा कठीण होते.

मात्र, जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या भास्कर यांच्या वडिलांना मुलाने उच्च शिक्षण घ्यावे असे वाटायचे. म्हणून त्यांनी पोटाला चिमटा घेत मुलाला शिकवले. वडिलांना कसनसूर येथील आश्रमशाळेत कामाठी म्हणून नोकरी लागली. त्याठिकाणीच भास्कर यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.

त्यानंतर यवतमाळ येथील केळापूर येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बीएड देखील केले.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काही काळ नोकरीदेखील केली. अशातच नागपुरातील लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून रूजू झाले. काही वर्षे येथे घालवल्यानंतर त्यांना राज्य शासनाकडून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

अमेरिकेत पोहचल्यावर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली. दरम्यान, त्यांना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले.

आज ते पत्नी व दोन मुलांसह अमेरिकेत वास्तव्यास आहेत. महिनाभरासाठी ते आपल्या गावी चिरचाडी येथे आले आहेत. आई-वडिलांच्या इच्छाशक्तीनेच मी आज घडलो असे ते आवर्जून सांगतात. त्यांनी महिनाभराच्या काळात गावात ग्रंथालय सुरू केले आहे.

रोज त्याठिकाणी मुलांना मार्गदर्शन करतात. पुढेही समाजातील मुलांना शिक्षणासाठी शक्य ती मदत करण्यास ते तयार आहेत. आगामी 5 वर्षात स्वच्छता, शेती आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर काम करण्याचा त्यांचा मानस आहे.

समाजातील मुलांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे अशी कळकळ डॉ. भास्कर हलामी यांनी व्यक्त केली. देश आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. तरीही आदिवासी समाजात पाहिजे त्या प्रमाणात शिक्षणाचे महत्त्व दिसून येत नाही.

यासाठी सामाजिक आणि आर्थिक स्थिती कारणीभूत असली तरी समाजातील मुलांनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करावे. यासाठी भास्कर आग्रही आहेत. उंच आभाळात भरारी घेत असताना आपल्या मुळांशी त्यांची जुळलेली नाळ त्यांना इतरांपासून वेगळे करते. त्यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरलाय.