परभणी : परभणी (Parbhani) शहरात खराब रस्त्यांची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. संपूर्ण रस्त्यांची मोठी चाळण झाली असून रस्त्यावर मोठं मोठे खड्डे बघायला मिळतात. त्यामध्येच आता पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि वाहनचालकांना त्या खड्ड्याचा अंदाज येत नाही. शहारातील रस्त्यांना (Road) पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटकांमध्ये देखील मोठी वाढ झालीयं. पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविल्याचा दावा दरवर्षी महापालिकेकडून (Municipality) केला जातो. मात्र, पहिल्या पावसामध्ये महापालिकेचे पितळ सर्रासपणे उघडते पडते. शहरातील नागरिकांनी आता स्वत: च्या पैशांनी शहरातील खड्डे बुजवण्याची मोहिम सुरू केलीयं.
परभणी शहरात लोकसहभागातून कामे करण्याची जणू पद्धतच निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात परभणीच्या रस्त्यांचे तीन तेरा वाजले असून रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शहरात सातत्याने अपघात होण्याच्या घटनेमध्ये वाढ झालीयं. महानगरपालिकेत नगरसेवक नसल्याने सर्वच कामे खोळंबली आहेत. प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच नागरिकांना दिली जातात.
शहरातील युसुफ कॉलनी परिसरात रस्त्यांवरील खड्यामुळे बेजार असलेल्या नागरिकांनी अखेर लोकसहभागातून रस्त्यांवरील खड्डे बुजवले. विशेष म्हणजे प्रभागातील नगरसेवकाच्या घरासमोरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डे सुद्धा नागरिकांनी स्वखर्चाने बुजवल्याने एकच चर्चा आता शहरात रंगू लागलीयं. शहरातील खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाला विनंती केली. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी स्वखर्चाने शहरातील खड्डे बुजवण्यास सुरूवात केलीयं.