अहमदनगर : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अहमदनगरला पारनेर तालुक्यातील सूप येथे रात्री साडेअकरा वाजता पूल आणि रस्त्याचं उद्घाटन केलंय. यावेळी जयंत पाटलांनी पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून झालेल्या वादावर देखील भाष्य केलं. आमदाराच्या जशा मर्यादा, तशा अधिकाऱ्यांच्याही मर्यादा ठरलेल्या आहेत, असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. निलेश लंके विधानसभेत अतिशय उत्तम काम करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये कोणीतरी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक करतंय, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
यावेळी त्यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावलाय. तसेच या गोष्टी राजकारणात होत असतात असं नमूद करत काही लोकांना मर्यादा सोडून वागण्याची सवय असते, मात्र प्रत्येकाने मर्यादित राहून काम करायचं असतं असा सल्लाही दिला.
जयंत पाटील म्हणाले, “गेल्या काही दिवसात कुणीतरी निलेश लंके यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करतंय. अशा गोष्टी राजकारणात होत असतात. काही लोकांना मर्यादा सोडून वागण्याची सवय असते. प्रत्येकानं मर्यादेत राहून काम करायचं असतं. मी एवढीच अपेक्षा करेन की निलेश लंके यांच्या सारखे नेते लोकांमध्ये राहून काम करतात, त्यांचे लोकांशी ऋणानुबंध आहेत. अशा नेतृत्वाला या छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे फार काही त्रास होईल असं वाटत नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. त्याचं मी समर्थन करणार नाही. मात्र, प्रत्येकाच्या मर्यादा लोकशाहीत ठरलेल्या आहेत. या मर्यादा जशा विधानसभेच्या सदस्याच्या ठरल्या आहेत, तशा अधिकाऱ्यांच्याही मर्यादा ठरल्या आहेत.”
“हा लोकशाहीचा गाडा व्यवस्थित चालवायचा असेल, तर मर्यादेत राहूनच काम झालं पाहिजे. या संबंधात थोडा त्रास होतोय याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, योग्य वेळी योग्य निर्णय होईल असा मला विश्वास आहे,” असं सूचक वक्तव्यही जयंत पाटलांनी केलं.