सोलापूर : एकीकडे पावसाचा कहर सुरु असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस अर्थात पीक काढणीची लगबग सुरु आहे. पावसापासून वाचलेली जी काही थोडी बहुत पिकं आहेत, ती घरी नेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. अशा परिस्थितीत सोलापुरात धक्कादायक घटना घडली. मळणी यंत्रात अडकून सेवानिवृत्त बँक अधिकार्याचा जागीच मृत्यू झाला.
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी इथं ही धक्कादायक घटना घडली. भास्कर पवार असे मृत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. पवार यांच्या शेतातील सोयाबीन काढलं होतं. काढलेल्या सोयाबीनची मळणी काढण्यात येत होती. त्यासाठी मळणी यंत्र शेतात आणलं होतं. सोयाबीनची रास हळूहळू मशीनमध्ये सरकवली जात होती. त्यावेळी मशीनवर हाताने सोयाबीन दाबत असताना, पवार यांना अंदाज आला नाही.
सोयाबीन आत मशीनमध्ये ढकलता ढकलता त्यांचा हात मशीनमध्ये अडकला. त्यानंतर काही कळायच्या आत त्यांना मशीनने आत खेचून घेतलं. त्यामुळे त्यांच्या खांद्यापासून वरचा शरीराचा भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला. यामध्ये भास्कर पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला.
काळ्या मातीत शेतकऱ्याने पिकवलेल्या सोयाबीनची रास दिसणं अपेक्षित होतं, तिथं भास्कर पवार यांच्या रक्ताचा सडा पडला होता. या घटनेने उपस्थित सर्वचजण हादरुन गेले.
सोलापूर परिसरात पडलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. 16 दरवाजे 85 सेंटीमीटर उघडून 40 हजार क्यूसेकने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आले.
पुणे, सोलापूर,नगर जिल्ह्यासह मराठवाड्यात वरदायिनी ठरलेले उजनी धरण सध्या 110 टक्के भरले आहे. उजनी धरणात सध्या 122. 66 टीएमसी एव्हढा पाणीसाठा आहे, दौंड आणि बंडगार्डनवरून येणारा पाणीसाठा सातत्याने वाढत असल्याने, तसंच उजनी पाणलोट क्षेत्रात सतत होणाऱ्या पावसामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे उजनीतून 40 हजार क्यूसेकने पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आलं.
संबंधित बातम्या
माझ्या ‘त्या’ विधानामुळे अजित पवारांवर IT छापे, शरद पवारांचा सोलापुरात दावा