देवेंद्र फडणवीस नव्हे, आघाडी सरकारच अस्वस्थ झालंय; प्रवीण दरेकरांचा पलटवार

| Updated on: Mar 27, 2021 | 5:23 PM

रश्मी शुक्ला प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुमरँग झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. (pravin darekar slams nawab malik over rashmi shukla issue)

देवेंद्र फडणवीस नव्हे, आघाडी सरकारच अस्वस्थ झालंय; प्रवीण दरेकरांचा पलटवार
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.
Follow us on

नाशिक: रश्मी शुक्ला प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुमरँग झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. सत्ताधाऱ्यांचा हा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फेटाळून लावला आहे. फडणवीस नव्हे तर आघाडी सरकामधील नेतेच अस्वस्थ झाल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केल आहे. (pravin darekar slams nawab malik over rashmi shukla issue)

नाशिक येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर आज शेतकऱ्यांच्या बांधावर आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीसांना अस्वस्थ होण्याची काहीच आवश्यकता नाही. फडणवीसांनी सरकारवर केलेला घणाघात, त्यांनी सरकारचे काढलेले गैरव्यवहार आणि घोटाळे बाहेर काढल्याने सरकाच अस्वस्थ झालं आहे. त्यामुळेच फडणवीस अस्वस्थ झाल्याचा कांगावा केला जात आहे, असं दरेकर यांनी सांगितलं.

पोलीस खात्याची बदनामी कोण करतंय?

आज महाराष्ट्रातील जनतेचा सरकारवर विश्वास नाही हे दाखवून देण्याचं काम फडणवीस करत आहेत. त्यामुळे त्यांना अस्वस्थ होण्याचा प्रश्न येतोच कुठे? उलट नवाब मलिक यांच्यासह सर्वजण अस्वस्थ आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्र पोलीस हे मलिक किंवा सरकार यांचे नाही. महाराष्ट्र पोलीस सर्वांचेच आहे. पोलिसांची बदनामी होऊ नये हे आम्हाला ही वाटतंय. परंतु पोलीस खात्यात बदनाम लोक आहेत. त्यांना संरक्षण दिलं जात आहे. पोलीस दलात वाझे सारख्यांना प्रमोशन दिलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अहवाल बाहेर आलाच कसा?

रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालाची दोन पानेच फडणवीसांनी दाखवली होती. पण हा संपूर्ण अहवाल मलिक यांनी लिक केला. एका दिवसात हा गुप्त अहवाल बाहेर आलाच कसा? मीडियाच्या हाती हा अहवाल लागलाच कसा? असा सवाल करतानाच दुसऱ्यांकडे दोन बोटं दाखवताना चार बोटं आपल्याकडे आहेत याचं भान सरकारला नाही हे दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.

राऊत-पटोलेंना टोला

यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यावरही टीका केली. ते कधी स्वबळाची भाषा करतात तर कधी एकमेकांना कडेवर घेतात. त्यांनाच त्यांचा थांगपत्ता नाही. भाजपची भीती वाटते म्हणून हे दोन्ही पक्ष एकमेकांना मिठ्या मारत असतात. शिवसेना आणि काँग्रेसचं काही खरं नाही. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. सत्तेसाठी त्यांनी विचारधारा गुंडाळून ठेवली आहे. पक्षस टिकवण्यासाठीच ते स्वबळाची भाषा करत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला. (pravin darekar slams nawab malik over rashmi shukla issue)

 

संबंधित बातम्या:

फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर, अनेकांचे बिंग फुटणार; देवेंद्र फडणवीसांचा दावा

ठाकरे सरकारकडून बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट; निलेश राणेंचा गंभीर आरोप

नाना पटोलेंच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची ठाम भूमिका; शरद पवारांबद्दल आदर पण….

 (pravin darekar slams nawab malik over rashmi shukla issue)