‘राहुल बजाज यांचं पूर्ण आयुष्य कारखान्याच्या आवारात गेलं’, शरद पवारांकडून श्रद्धांजली, सांगितले मैत्रीचाही किस्से

| Updated on: Feb 12, 2022 | 7:30 PM

देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची औद्योगिक उभारणी करण्यात काही लोकांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यात महत्वाची नावं आहेत. जेआरडी टाटा, किर्लोस्कर यांनी देशाची औद्योगिक पायाभरणी केली. त्यांच्यानंतर दुसऱ्या फळीत राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे. हे कुटुंब मूळ वर्ध्याचं आहे. ते गांधी विचारांचे आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय हा कापसाचा होता. नंतरच्या पिढीने एका वेगळ्या दृष्टीने पुढे जायचा विचार केला, असं शरद पवार यांनी सांगितलं.

राहुल बजाज यांचं पूर्ण आयुष्य कारखान्याच्या आवारात गेलं, शरद पवारांकडून श्रद्धांजली, सांगितले मैत्रीचाही किस्से
राहुल बजाज, शरद पवार
Follow us on

पुणे : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं आज दु:खद निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बजाज समुहाच्या उभारणीमध्ये राहुल बजाज यांचं मोठं योगदान राहिलं आहे. बजाज यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना हार्ट आणि लंग्स संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्धापकाळामुळे उपचाराला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. हळहळू त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज अखेर त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राहुल बजाज यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच बजाज यांचे काही किस्सेही सांगितले आहेत.

शरद पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची औद्योगिक उभारणी करण्यात काही लोकांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यात महत्वाची नावं आहेत. जेआरडी टाटा, किर्लोस्कर यांनी देशाची औद्योगिक पायाभरणी केली. त्यांच्यानंतर दुसऱ्या फळीत राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे. हे कुटुंब मूळ वर्ध्याचं आहे. ते गांधी विचारांचे होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा कापसाचा होता. नंतरच्या पिढीने एका वेगळ्या दृष्टीने पुढे जायचा विचार केला. ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठं योगदान राहुल बजाज यांनी दिलं आहे. राहुल बजाज यांच्या कारखानदारीची सुरुवात पुण्यापासून झाली. पिंपरी-चिंचवड हा संबंध औद्योगिक परिसरात ते कदाचित एकमेव उद्योजक असतील, ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे कारखान्याच्या आवारात गेलं. आकुर्डीत कारखान्यात ते राहिले आणि नंतर ते औरंगाबादमध्ये गेले. राज्य सरकार आणि बजाज यांनी मिळून साताऱ्यातही एक कारखाना काढला होता. राहुल बजाज हे वेगळे उद्योजक होते. जे समाजाच्या हिताचे असेल त्याची बाजू ते घ्यायचे. आपली बाजू सरकारला पटेल का नाही याची काळजी ते करत नव्हते, स्पष्टवक्ते होते. त्यांचा राज्यसभेतला काळ हा लक्षात राहील असा होता. राहुल बजाज बोलणार म्हटल्यावर सभागृहात 100 टक्के उपस्थिती असायची, असंही शरद पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर मित्र म्हणून त्यांच्याशी माझा व्यक्तीश: संबंध होता. आमचा दोन पिढ्यांचा संबंध होता. मैत्रिचा ओलावा होता, घरोबा होता, असंही पवार यांनी सांगितलं.

बजाज यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

राहुल बजाज यांचे पार्थिव थोड्याच वेळात रुबी हॉल हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी आकुर्डी येथील कंपनीत ठेवलं जाणार आहे, त्यानंतर रविवारी संध्याकाळी चार वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

बजाज उद्योग समुह हा देशातील टॉप उद्योग समुहांपैकी एक आहे. बजाज ऑटोला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. बजाज उद्योग समुहाच्या माध्यमातून देशात मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. राहुल बजाज यांनी या उद्योग समुहाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कार्याची दखल म्हणून 2001 मध्ये राहुल बजाज यांचा भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

इतर बातम्या :

10 मार्चनंतर महाविकास आघाडीला सत्ता सोडण्याची वेळ येईल! चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, कारणही सांगितलं

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, डॉक्टरांनी पहिल्यांदाच कारण सांगितलं