Explainer : छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी किल्ले रायगडची ही आणखी नावे तुम्हाला माहित आहे का?

| Updated on: Dec 16, 2023 | 8:36 PM

"तख्तास जागा हाच गड करावा.” असे शिवाजी महाराज यांनी ठरवले. गडाच्या बांधणीचे काम शिवाजी महाराज यांनी हिरोजी इंदलकर यांच्याकडे सोपवले. १६५६ ते १६७० या १४ वर्षात हिरोजींनी गडावर ३५० इमारती, ११ तलाव आणि ८४ पाण्याच्या टाक्या बांधल्या.

Explainer : छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी किल्ले रायगडची ही आणखी नावे तुम्हाला माहित आहे का?
Chhatrapati Shivaji Maharaj Raigad fort
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी म्हणजे किल्ले रायगड. शिवपुर्वकालीन या किल्ल्याचे नाव रायरी होते. निजामशाहीच्या काळात रायरीचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता केला जात असे. हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. प्रतापगडाचा पायथा ते रायरीच्या उत्तरेकडील कोकण दिवा इथपर्यंत जावळीचे खोरे पसरलेले होते. घनदाट झाडी असलेला हा प्रदेश लष्करी दृष्ट्या मोक्याचा होता. शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या विस्तारासाठी जावळीचा ताबा मिळविण्याचे ठरवले.

शिवाजी महाराजांनी सिलिमकर, बांदल, कान्होजी जेधे यांच्यासह संभाजी कावजी या शूर सरदारास जावळीवर पाठवले. मोरे यांनी हा पहिला हल्ला परतवला. तेव्हा महाराजांनी रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना आणखी फौज देऊन जावळीवर रवाना केले. त्यावेळी मोठे युद्ध झाले. जावळीकर यशवंतराव मोरे रायरीच्या डोंगरावर गेले. महाराजांनी त्याचा पाठलाग केला. यशवंतराव मोरे यांनी तीन महिने रायरी झुंजविली. अखेर इलाज चालेना म्हणून ते शिवाजी महाराज यांना शरण आले. १६५६ मध्ये जावळी प्रदेशाचा अधिकारांत समावेश झाल्यामुळे शिवाजीराजे डोंगराळ कोकण प्रदेशाचे सर्वाधिकारी बनले.

१९५६ मध्ये रायरी हा शिवाजी महाराज यांच्या ताब्यात येण्यापूर्वी त्याची अनेक नावे होती. १६१८ ते १६५६ पर्यंतच्या अनेक कागदपत्रांमधून रायरी याची नावे राईर, रायेर, राहीर, राहेर अश्या स्वरुपात आढळतात. परंतु, रायरी हेच रायगडाचे मूळ नाव आहे. रायरी जिंकल्यानंतर महाराजांनी पुढे त्याचे नामकरण रायगड असे केले.

“तख्तास जागा हाच गड करावा.” असे शिवाजी महाराज यांनी ठरवले. गडाच्या बांधणीचे काम शिवाजी महाराज यांनी हिरोजी इंदलकर यांच्याकडे सोपवले. १६५६ ते १६७० या १४ वर्षात हिरोजींनी गडावर ३५० इमारती, ११ तलाव आणि ८४ पाण्याच्या टाक्या बांधल्या. रायगडावरून तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड आणि मानगड हे किल्ले दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावेळी हजर असलेल्या हेनरी ऑक्सिनडन या ब्रिटिश अधिकाऱ्याने रायगडाची तुलना “जिब्राल्टर्स” अशी केलीय. “जिब्राल्टर्स” म्हणजे सर्वात टणक खडक. रायगडाचे वर्णन करताना त्याने हा गड इतका अभेद्य आहे की इथे फक्त वारा आणि मराठेच येऊ जाऊ शकतात असे केलेय.

रायगडाचे पूर्वी रायरी हे नाव होते त्याचप्रमाणे त्याची आणखी काही नावे आहेत. अनेक इतिहास ग्रंथामध्ये रायगडाच्या नावांची एक यादीच आढळून येते. चित्रे घराण्यातील उत्तरकालीन कागदातील नोंदी आणि धुळे येथील हस्तलिखितातही ‘रायगड किल्ल्याची हकीकत’ यात ही नावे आली आहेत.

रायरी हा पूर्वी फक्त एक डोंगर होता त्यावेळी त्याला ’रासिवटा’ आणि ’तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची आणि सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ’नंदादीप’ असेही म्हणत असत. तर युरोपचे लोक त्यास ’पूर्वेकडील जिब्राल्टर’ म्हणत. १६८९ ला रायगड औरंगजेबाचा ताब्यात गेला. औरंगजेबाने त्याचे नामकरण इस्लामगड असे केले. तणस, रासीवटा, नंदादिप. रायरी, रायगड, इस्लामगड ही रायगडाची आणखी नावे आहेत. बाकी इतर काही नावे ही अपभ्रंश आहेत.