Rain forecast : राज्यात 20 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज; अनेक भागात ऑरेंज अलर्ट

| Updated on: Sep 17, 2022 | 8:12 AM

राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे.  दरम्यान पुढील तीन दिवस अशीच स्थिती कायम असणार आहे, अशी अशक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. 

Rain forecast : राज्यात 20 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज; अनेक भागात ऑरेंज अलर्ट
Follow us on

मुंबई :  राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे.  दरम्यान पुढील तीन दिवस अशीच स्थिती कायम असणार आहे, अशी अशक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.  कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यात यलो अलर्ट आहे. सध्या पुण्यासह (Pune) मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक, पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे यंदा गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  राज्याच्या काही भागात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानं त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 20 धरणांत 100 टक्के पाणीसाठा

पुणे जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्यानं जिल्ह्यातील 26 धरणांपैकी 20 धरणं 100 टक्के भरली आहेत. तर इतर धरणात देखील 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.   खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणीपातळीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे पुणे शहरासह जिल्ह्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या चार दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.