जनतेला अहंकार आणि भाषण नको, काम हवं, रोहित पवारांचा भाजपवर हल्ला

| Updated on: Jan 15, 2021 | 8:17 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर हल्लाबोल केलाय.

जनतेला अहंकार आणि भाषण नको, काम हवं, रोहित पवारांचा भाजपवर हल्ला
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर हल्लाबोल केलाय. “महाविकासआघाडी याआधी विधान परिषदेच्या निवडणुकीत यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालंय. लोकांनी आघाडीला साथ दिलीय. ग्रामपंचायत निवडणुकीतही हेच दिसेल. जनतेला अहंकार आणि भाषण नकोय, त्यांना काम हवं आहे,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं (Rohit Pawar criticize BJP and Modi Government amid Grampanchayat Election).

रोहित पवार म्हणाले, “ग्रामपंचायत स्तरावर पक्ष कधी पुढाकार घेत नसतो. तेथे कार्यकर्ते पदाधिकारी असतात. ते त्याठिकाणी पुढाकार घेत असतात. महाविकास आघाडीचे स्थानिक नेते जर एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेणार असतील तर त्याचं स्वागतच आहे. या निवडणुकीत वरिष्ठ नेते लक्ष देतील असं नाही, पण ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. एखादी योजना शेवटपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रामंपचायत स्तरावर आपल्या विचाराची लोकं असणं उपयोगी होतं. असं असलं तरी ग्रामपंचायत निवडणूक हा त्या त्या गावाचा विषय असतो.”

“पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व शिक्षित मतदार असतात. त्यांना जगात काय चाललंय हे माहिती असतं. अशा परिस्थितीत भाजपचे नागपूर आणि पुणे हे दोन बालेकिल्ले 50 वर्षांपासून भाजपच्या विचाराचे होते. त्या ठिकाणी यावेळी मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. इतिहासात पहिल्यांदाच कदाचित एखादा उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून आलाय. उच्च शिक्षित लोकं महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे आहेत. त्यावरुनच परिवर्तन होतंय हे स्पष्ट आहे,” असंही रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “लोकांना फक्त अहंकार किंवा भाषण नकोय. महाराष्ट्रातील पोलिसांना, येथील लोकांना, डॉक्टरांना मदत हवी होती तेव्हा केंद्राकडून मदत मिळाली नाही. आजपर्यंत केंद्राकडून कुठलाही पैसा आलेला नाही. त्यासाठी विरोधी पक्ष भाजपने एकही पत्र लिहिलेलं नाही. त्यामुळे लोकांना या गोष्टी कळाल्या आहेत. म्हणूनच लोकं महाविकासआघाडीसोबत राहिले आहेत. हेच ग्रामपंचायत निवडणुकीतही होईल.”

“कुठल्याही पक्षाचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असतात अधिकारी असतात. ते सर्वजण पक्ष आणि कार्यकर्त्यांना ऐकत असतात. काही वेळेला या ऐकताना कार्यकर्त्यांची मागणी असते. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना मत मांडण्याची संधी दिली जाते. काँग्रेसने कदाचित कार्यकर्त्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली, परंतु शेवटी निर्णय पदाधिकारी घेतात आणि पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय घेतील असं वाटतं,” असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

रोहित पवारांची संकल्पना, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेकडून पोलिसांना चारचाकी आणि दुचाकी वाहने!

राजकीय पक्ष बाजूला ठेवून ऊसतोड कामगारांसाठी काम करुया, पंकजा ताई किंवा रोहित पवारांनी नेतृत्व करावं : सुजय विखे पाटील

महिलांच्या सबलीकरणात शरद पवारांचं मोठं योगदान; रोहित पवारांची स्तुतिसुमनं

Rohit Pawar criticize BJP and Modi Government amid Grampanchayat Election