आता मरणही महागलं, कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा खर्च नातेवाईकांकडून वसूल करणार

| Updated on: May 09, 2021 | 11:04 AM

वर्षभराला लागणारा खर्च आता एक महिन्याला येत आहे. | Funeral Coronavirus

आता मरणही महागलं, कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा खर्च नातेवाईकांकडून वसूल करणार
Follow us on

वर्धा: आतापर्यंत वर्ध्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून अंत्यसंस्कारासाठी (Funeral) कोणतेही शुल्क घेतले जात नव्हते. मात्र, मृतांच्या वाढत्या संख्येमुळे आता कोरोना मृतांच्या नातेवाईंकांकडून अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये आकारण्याचा निर्णय वर्धा महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता मरणही महाग झाल्याची भावना सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. (Wardha Mahanagarpalika will charge money for cremation of corona death patients)

वर्ध्यात अंत्यसंस्कारासाठी पालिकेने महिनाभरात जवळपास 40 लाख रुपये खर्च केले आहेत. गेल्या वर्षभरात येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हजारांवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेत. त्यासाठी लागणारा खर्च कुणाकडूनही घेण्यात आला नाही. जिल्हाधिकार्‍यांनी याकरिता आपत्ती व्यवस्थापन अथवा खनिकर्मकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. निधीकरीता नगरपालिकेच्या वतीने प्रशासनाला कळविण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे वर्धा महानगरपालिकेने नाईलाजाने अंत्यसंस्कारासाठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षभरासाठी राखीव असलेला निधी एका महिन्यातच खर्च

1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. दररोज एक ते सव्वा लाख रुपये खर्च होत आहे. महिन्याला हा खर्च 30 लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी वर्षभराला लागणारा खर्च आता एक महिन्याला येत आहे. राज्यात कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी खर्च घेतला जातो.

आता खर्च वाढला असल्याने आणि पालिका हा खर्च करण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने निधी न दिल्याने याकरीताचा खर्च घेण्यात येत आहे. वसुधा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, निधी नसल्याने संस्थेच्या कार्यावर ताण आला आहे.

पालिकेने वारंवार विनंती करुन प्रशासनाकडून दखल नाहीच

अंत्यसंस्कार व दाह संस्काराची जबाबदारी वर्धा पालिकेने वसुधा वुडलेस फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर सोपवली. संस्था ना नफा, ना तोटा तत्त्वावर प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये आकारत आहे. जिल्ह्यातील रूग्णासोबतच अन्य जिल्ह्यातून उपचारसाठी आलेल्या मृतकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च पालिकेने दिला. 31 मार्च 2021पर्यंत 745 मृतदेहांवर दाहसंस्कार झाले आहे. त्यापोटी वसुधा संस्थेला पालिकेने 18लाख 62 हजार रुपये दिले. 1 एप्रिलपासून मृत्यूसंख्या वाढल्याने एका दिवसाचा खर्च एक लाख रुपयावर पोहोचला आहे. एप्रिल व मे चा अंदाजित खर्च 60 लाख रुपये अपेक्षित असल्याने हा खर्च पालिकेला करणे शक्य नाही. हा पालिकेने आपत्ती व्यवस्थापन निधीतून मंजूर करण्याची विनंती केली आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतेच उत्तर पालिकेला मिळाले नाही.

निधी न दिल्याने आता पालिका प्रशासन खर्च करण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात आले. कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नातलगांकडून 2500 रुपये घेण्यात यावे, अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोविड मृतांच्या अंत्यसंस्काराची निशुल्क सेवा पालिकेच्या वतीने थांबवण्यात आली आहे.

(Wardha Mahanagarpalika will charge money for cremation of corona death patients)