संभाजीराजेंची विनंती मुख्यमंत्र्यांकडून मान्य, तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी 50 लाख रुपये जाहीर

| Updated on: Dec 05, 2020 | 12:16 AM

तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 लाख रुपये जाहीर केले आहेत.

संभाजीराजेंची विनंती मुख्यमंत्र्यांकडून मान्य, तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी 50 लाख रुपये जाहीर
छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 लाख रुपये जाहीर केले आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी विनंती केली होती. ही विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. (Rs 50 lakh announced for preservation and conservation of Jinji Fort in Tamil Nadu Cm uddhav Thackeray)

स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या जिंजी किल्ल्यास आज (शुक्रवार) छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला. पूर्वी असलेल्या किल्ल्याचे नुतनीकरण करुन महाराजांंनी हा किल्ला नव्याने बांधून घेतला.

“महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा संपूर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्यांचं जतन, संवर्धन, आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिंजी किल्ल्याला भेट दिल्यानंतर मा. मुख्यमंत्री यांच्याशी याविषयी फोनवर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिंजी किल्ल्यावरील राजसदरेच्या संवर्धनासाठी याठिकाणी मराठा हिस्ट्री गँलरी उभारणीसाठी तात्काळ 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचे यासाठी विशेष आभार व्यक्त करतो”, असं संभाजीराजे म्हणाले.

मराठ्यांच्या इतिहासात दुर्गराज रायगडला जितकं महत्व आहे तितकंच महत्व जिंजीच्या किल्ल्यालासुध्दा आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांना फंदफितूरीने पकडून छळ करुन मारण्यात आले. त्यावेळी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले आणि तिथून  राज्यकारभार पाहू लागले. यामुळे औरंगजेबाला आपले निम्मे सैन्य दक्षिणेकडे पाठवावे लागले. परिणामी स्वराज्यावरील मुघल सैन्याचा दबाव कमी झाला व मराठ्यांनी गेलेले किल्ले व प्रदेश पुन्हा जिंकून घेतले.

जिंजीसारखा अभेद्य किल्ला पाहताना महाराजांच्या दूरदृष्टीची जाणीव पदोपदी होत होती. पूर्वी या ठिकाणी कृष्णगिरी, राजगिरी, चंद्रयान दुर्ग (चंद्रगिरी) हे वेगवेगळे तीन किल्ले होते. तिथे संरक्षणाच्या दृष्टीने तटबंदी बांधून तिघांचा मिळून एक किल्ला शिवाजी महाराजांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला. पूर्वी असलेल्या किल्ल्याचे नुतनीकरण करुन महाराजांंनी हा किल्ला नव्याने बांधून घेतला. याच किल्ल्याला संभाजीराजे यांनी भेट दिली.

(Rs 50 lakh announced for preservation and conservation of Jinji Fort in Tamil Nadu Cm uddhav Thackeray)

संबंधित बातम्या

दसऱ्याचा मुहूर्त साधून गडसंवर्धनाचे काम, ‘बाण हायकर्स’ची गायमुख किल्ला साफसफाई मोहीम!